
स्वयंपाक करताना अनेकदा भांडी जळतात किंवा अन्नाचे थर साचून ती काळी पडतात. अशी भांडी घासणे म्हणजे गृहिणींसाठी मोठे कष्टाचे काम असते. तासनतास मेहनत करूनही अनेकदा हा काळेपणा पूर्णपणे जात नाही. पण आता काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या किचनमधील काही साहित्याचा वापर करून तुम्ही ही घाणेरडी भांडी काही मिनिटांत नव्यासारखी चमकवू शकता.

जळलेल्या भांड्यावर शॅम्पू, मीठ आणि लिंबाचा रस आणि पाणी टाकून उकळा. १० मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवल्यास भांड्याचा काळेपणा पूर्णपणे सैल होतो. त्यानंतर लिंबाच्या सालेने घासल्यास तवा किंवा कढई नव्यासारखी चमकू लागते.

भांड्याच्या काळ्या पडलेल्या भागावर टूथपेस्ट लावून ५ मिनिटे सुकू द्यावी. त्यानंतर जुन्या फॉइल पेपरचा गोळा करून किंवा स्टील स्क्रबरने तो भाग जोर देऊन घासावा. शेवटी डिश वॉशने धुतल्यास भांड्यावरील डाग सहज निघून जातात.

पाण्यात बेकिंग सोडा, लिंबू आणि व्हिनेगर मिसळून ते मिश्रण जळलेल्या भांड्यात चांगले उकळवावे. या प्रक्रियेमुळे भांड्याला चिकटलेले अन्नाचे थर आणि जळलेला भाग लगेच कमी होतो. साध्या स्क्रबरने घासल्यानंतरही भांडे आरशासारखे स्वच्छ दिसू लागते.

लोखंडी तवा जास्तच खराब झाला असेल, तर तो स्वच्छ करण्यासाठी सँडपेपर (रेगमल) वापरावा. सँडपेपरने तवा घासल्यामुळे त्यावर साचलेला गंज आणि काळा थर त्वरित निघून जातो. हा उपाय लोखंडी भांडी टिकण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतो.

नैसर्गिक पद्धतीने भांडी स्वच्छ करायची असल्यास चिंचेची पेस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. चिंचेमधील आम्ल गुणामुळे भांड्यांवरील चिकटपणा आणि काळे डाग सहजपणे साफ होतात. जुन्या आणि काळवंडलेल्या कढईसाठी हा उपाय हमखास रिझल्ट देतो.