मी मराठी बोलतो, या माझ्या रिक्षात बसा! मराठी सक्तीच्या वादात पोस्टरची चर्चा
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते. आता या विरोधात अमराठी रिक्षा चालक एकवटले आहेत. त्यांनी 4 मे पासून संपावर जाणार असल्याचे म्हटले आहे.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या 'मराठी सक्ती'च्या निर्णयाला आता प्रत्यक्ष जमिनीवर पाठिंबा मिळताना दिसत आहे. 1 मेपासून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाच्या समर्थनार्थ कंबर कसली असून, अंधेरी पश्चिम भागात मनसेच्या वतीने रिक्षांवर विशेष स्टिकर्स लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

मनसेचे अंधेरी पश्चिम विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि म.न.वि.से. (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) उपाध्यक्ष कुशल धुरी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अंधेरी परिसरातील रिक्षांवर मनसेचे अधिकृत स्टिकर्स लावून 'मराठी'चे समर्थन केले जात आहे.

या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रिक्षांच्या मागील बाजूस लावण्यात आलेले स्टिकर्स. या स्टिकरवर अतिशय स्पष्ट आणि ठळक शब्दांत संदेश देण्यात आला आहे. "मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा!" हा संदेश प्रवाशांना आकर्षित करण्यासोबतच, मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी लावण्यात आला आहे.

काही अमराठी रिक्षा संघटनांनी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शवला असताना, मनसेच्या या पावलामुळे मराठी भाषिक रिक्षाचालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मनीष धुरी आणि कुशल धुरी यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर इथली भाषा येणे अनिवार्य आहे आणि जे चालक मराठी बोलतात, त्यांना प्रवाशांनी प्राधान्य द्यावे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

अंधेरी पश्चिम हा मुंबईतील गजबजलेला भाग आहे. येथे अनेकदा परप्रांतीय चालकांशी संवाद साधताना प्रवाशांना भाषेची अडचण येते. अशा परिस्थितीत "मराठी येते" असे फलक लावलेल्या रिक्षांना प्रवाशांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मनसेच्या या 'स्टिकर' मोहिमेमुळे आता मुंबईत 'मराठी विरुद्ध अमराठी' हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.