India Vs Pak: पाकिस्तानला हरवल्यानंतर अभिषेक शर्माचं 4 शब्दांचं ट्विट चर्चेत
India Vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यानंतर अभिषेक शर्माने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. अभिषेकने मॅचदरम्यानचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना झाला. रविवारी 21 सप्टेंबर रोजी दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचे युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी जबरदस्त कामगिरी केली.
अभिषेक शर्मा (39 चेंडूंत 74) आणि शुभमन गिल (28 चेंडूंत 47) या सलामीवीरांच्या आक्रमक खेळींच्या जोरावर टीम इंडियाने रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. या मॅचनंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन करणं टाळलं.
अभिषेक शर्माने अवघ्या 24 चेंडूंत अर्धशतक साकारलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेंटी-20 सामन्यात हे आजवरचं दुसरं सर्वांत जलद अर्धशतक ठरलं. अभिषेकची मैदानात पाकिस्तानी खेळाडूंशी बाचाबाची झाली. तर मॅचनंतर चार शब्द ट्विट करत त्याने पाकिस्तानच्या टीमला उत्तर दिलं आहे.
'You talk, we win' (तुम्ही बोलत राहा, आम्ही जिंकलो) असं ट्विट अभिषेक शर्माने केलंय. त्याचसोबत त्याने मॅचदरम्यानचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. अभिषेकचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर अभिषेक शर्माची निवड सामनावीर म्हणून करण्यात आली. आपल्या स्फोटक फलंदाजीने त्याने अनेक विक्रम मोडले. टी-20 सामन्यात 50 षटकार मारणारा तो सर्वांत जलद फलंदाज ठरला. त्याने 331 चेंडूंत ही कामगिरी केली.