
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय या महिन्यात भक्तांना पाहायला मिळत आहे. स्वामी चरणपादुकांचा दैवी अध्याय सध्या 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत सुरु आहे आणि आता याच शृंखलेत अजून एक अध्याय जोडला जाणार आहे.

येत्या आठवड्यात श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या अध्यायातला महत्वाचा टप्पा या आठवड्यात सादर होतो आहे. स्वामी चरणपादुका जशा पिढ्यानपिढ्या पुजल्या जातात, तशाच ज्या घरात त्यांची पूजा थांबते तेव्हा त्या योग्य व्यक्तीच्या हाती जातात.

स्वामींच्या पादुकांचा हा दैवी प्रवास विलक्षण रंजक असून त्यापाठची उत्कंठावर्धक कथा सोपान आणि अवंती या दोन वेगळ्या गावात राहणाऱ्या स्वामी भक्तांच्या लोकविलक्षण गोष्टीतून उलगडत जाते.

प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून पहावी अशी ही गोष्ट चरणपादुकांच्या अध्यायातल्या अज्ञात अशा पैलूवर प्रकाश टाकते. "अनुभवाशिवाय विश्वास बसत नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही," स्वामींच्या या शब्दांना प्रत्येक भागात उजाळा मिळत आहे.

या अध्यायाची सुरुवात आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ट मैत्रिणींच्या गोष्टीने झाली. यानंतर नव्या परंपरेचा आरंभ झाला, ज्यात स्वामी मुखवट्याचा महिमा उलगडला.

स्वामींच्या मुखवटा - पादुकांमधून प्रकट होणाऱ्या चमत्काराने नवजात बाळावर पडणारी पिशाच्च सावली दूर होते आणि देवकीला पुत्रसुख प्राप्त होते. आता या स्वामी पादुकांनी सोपान आणि अवंती या भक्तांचा कसा उद्धार होणार आणि पुढे मालिकेला कुठलं रंजक वळण येणार हे मालिकेत पुढे पहायला मिळेल.