
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेची नीट काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. दिवसातून किती वेळा आंघोळ केली पाहिजे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? दररोज आंघोळ करावी यावर सर्वांचेच एकमत असते पण अनेक त्वचारोग तज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आंघोळ करणे देखील पुरेसे आहे. ते कसे हे जाणून घेऊया.

स्वच्छता राखण्यासाठी, नियमित आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. पण, काही दिवस अंघोळ न करणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, जास्त आंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे केवळ आपली त्वचाच नाही तर आपले केसही कोरडे, दुभंगलेले आणि निर्जीव होऊ शकतात. तुम्ही किती वेळ आंघोळ करता यावरही ही गोष्ट अवलंबून असते.

3 ते 5 मिनिटे अंघोळ करावी, त्यावेळी शरीराचे सर्व भाग स्वच्छ करावेत, मळ काढावा. चेहरा, मान, कंबर, कोपर, गुडघे अशा सर्व जागा नीट स्वच्छ कराव्यात. प्रत्येक वेळेस स्क्रबिंग केलेच पाहिजे असे नाही.

मात्र त्वचेचा पोत, वय, कोणता ऋतू सुरू आहे, जीवनशैली कशी आहे, तसेच तुम्ही काय काम करता यावरही किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून असते. उदाहरणार्थ - तुम्ही शेतात काम करत असाल किंवा जास्त कष्टाचे काम असेल तर घरी बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळा अंघोळ करावी लागेल.