‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट; नव्या प्रोमोला काही तासांतच 1 मिलियन व्ह्यूज, उत्सुकता शिगेला
'ठरलं तर मग' ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय मालिका असून रात्री 8.30 वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या मुख्य भूमिका आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सायली आणि अर्जुनचा प्रवास प्रेक्षकांनी आपल्या घरातील मुला-मुलीसारखा जपला आहे.

त्यांच्या प्रत्येक आनंदात प्रेक्षक सहभागी झाले आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत भावनिकरित्या उभे राहिले. आता या लोकप्रिय मालिकेत सर्वात मोठं आणि धक्कादायक वळण येणार आहे. बाळाच्या आगमनाची आनंदमयी तयारी सुरू असतानाच सायलीच्या आयुष्यात वादळ येणार आहे.

ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात पोलीस येऊन सायलीला अटक करणार आहेत. अनाथाश्रमातील मुलींची तस्करी केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणात घडणारी ही अनपेक्षित घटना अर्जुन आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणार आहे.

या धक्कादायक ट्विस्टची झलक दाखवणाऱ्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही तासांत प्रोमोने 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला असून 350 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. सायलीच्या पाठीशी उभं राहत प्रेक्षकांनी तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे आणि पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

"'ठरलं तर मग' मालिकेला चार वर्षे पूर्ण होतील. या चार वर्षात प्रेक्षकांची साथ मोलाची होती. मालिकेतली एखादी गोष्ट आवडली तर प्रेक्षकांनी पाठ थोपटली. कधी चुकलो तर हक्काने कान पिळले. मालिकेचा पुढचा प्रवास आता अधिक रंजक होणार आहे. डोहाळ जेवणाच्या दिवशी सायलीला अटक होण्याच्या प्रोमोला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला हे पाहून खूप भारावून गेले," अशी भावना जुई गडकरीने व्यक्त केली.

मात्र सायली इतक्यात हार मानणाऱ्यांपैकी नाही. स्वतःवरील खोटे आरोप दूर करून सत्य जगासमोर आणण्यासाठी ती खंबीरपणे लढणार आहे. कारण आई होणारी स्त्री केवळ नवीन जीवाला जन्म देत नाही, तर आपल्या बाळाच्या भविष्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाण्याचं बळही तिच्यात असतं. सायलीचाही हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या बाळाच्या सुरक्षित भविष्याकरिता आणि सत्याच्या विजयासाठी असणार आहे.