80 रुपये किलोचा झेंडू थेट 10 रुपयांवर, ऐन गणेशोत्सवात शेतकऱ्यावर आली फुलं कचऱ्यात फेकण्याची वेळ
सोमवारी गणरायाचं आगमन होणार आहे. तर गणरायाच्या स्वागतासाठी आलेला झेंडू मातीमोल झाल्याचं चित्र कल्याण येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिसत आह. कल्याण एपीएमसी फुल मार्केटमध्ये 80 रुपयांचा भाव थेट 10 रुपयांवर पोहोचला आहे. यात कारणामुळे शेतकऱ्यांवर फुले कचऱ्यात फेकण्याची वेळ आली आहे.

दादरनंतर फुल विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या कल्याणच्या APMC फुल मार्केटमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी आणली जातात. यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून शेतकरी झेंडूची फुले घेऊन कल्याण APMC मार्केटमध्ये दाखल झाले आहे
मात्र यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने झेंडूच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 70 ते 80 रुपये किलोने विकली जाणारी फुले सध्या अवघ्या 10 ते 30 रुपये किलो दराने विकली जात आहेत.
अचानक भाव कोसळल्याने फुले विक्रीसाठी येण्या-जाण्याचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारणामुळे देखील फुले कचऱ्यात फेकली आहेत.
विक्रीअभावी मोठ्या प्रमाणात फुले बाजारातच शिल्लक आहेत. अखेर अनेक शेतकऱ्यांवर न विकलेली फुले कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली असून मार्केट परिसरात कचऱ्यामध्ये या फुलांचे ढीग लागलेले पाहायला मिळत आहे.
वर्षभर गणेशोत्सवाची वाट पाहून यंदा चांगली कमाई होईल, अशी अपेक्षा असलेल्या बळीराजाच्या पदरी निराशाच आली आहे. अशात सरकारने आर्थिक मदत करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.