मुंबईत कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू, कोणत्या लोकांनी कलिंगड खाणे टाळावे?
मुंबईत कलिंगड खाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कलिंगड खाताना कोणती खबरदारी घ्यावी, विषबाधा कशी टाळावी आणि आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या व्यक्तींनी कलिंगड खाणे टाळणे हिताचे आहे, याचे सविस्तर विश्लेषण.

मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

यामुळे कलिंगड खाण्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कलिंगड हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे फळ असले, तरी काही विशिष्ट परिस्थितीत त्याचे सेवन अत्यंत घातक ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, परंतु चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी त्याचे सेवन केल्यास फूड पॉइजनिंग होऊ शकते. त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कलिंगड खाणे टाळा.

रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था मंदावलेली असते. कलिंगडात नैसर्गिक साखर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने रात्री ते पचण्यास जड जाऊ शकते. ज्यामुळे पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

बाजारात कापून ठेवलेले कलिंगड कधीही घेऊ नका. कापलेल्या फळावर बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेतल्यास पचन संस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.

ज्यांना वारंवार गॅस, अपचन किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास आहे, त्यांनी कलिंगड मर्यादित प्रमाणातच खावे. कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते. मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.

कलिंगडात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांना अतिरिक्त पोटॅशियम शरीराबाहेर टाकण्यास अडचण येते, जे हृदयासाठी घातक ठरू शकते. काही लोकांना कलिंगडामुळे ॲलर्जी किंवा घशात खवखव होऊ शकते. दम्याचा त्रास असलेल्यांनी थंड कलिंगड खाऊ नये.

जर कलिंगड खाल्ल्यानंतर उलट्या, जुलाब, पोटात तीव्र कळा येणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसली, तर घरगुती उपाय न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात धाव घ्यावी.