नीता अंबानी संपूर्ण लग्नात घेऊन फिरत होत्या, ते ‘रामन दिवो’ काय? लग्नात ‘रामन दिवो’चे महत्व काय?
Anant Radhika Wedding: रिलायन्स कंपनीचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीती अंबानी यांच्या मुलगा अनंत यांचे लग्न १२ जुलै रोजी झाले. अनंत आणि राधिका यांच्या विवाह समारंभ कार्यक्रम तीन दिवस चालला. त्या कार्यक्रमास जगभरातील दिग्गज आले होते.

अनंत अन् राधिकाच्या लग्नात सर्वांचे लक्ष नीता अंबानी यांच्याकडे जात होते. नीता अंबानी यांच्या हातात एक वस्तू सतत दिसत होती. त्यात गणरायाची प्रतिमा दिसत होती. त्याला 'रामन दिवो' म्हणतात. त्यामुळे लग्नात नीता अंबानी ते का घेऊन फिरत होती? हा प्रश्न सर्वांना पडला.

अंबानी परिवाराची निष्ठा हिंदू परंपरा आणि सनातन धर्मात आहे. त्या संदर्भात चर्चा होत असते. या सोहळ्यात काशीची थिम निवडण्यात आली होती. त्यात सृष्टीचे पालनकर्ता म्हटले जाणारे भगवान श्री हरी विष्णूचा दशावतार दाखवला.

विवाह सोहळ्यात गणपतीची प्रतिमा असलेले 'रामन दिवो' नीता अंबानी सतत घेऊन फिरत होत्या. त्या गणपतीच्या प्रतिमेसोबत दिवासुद्धा होता. ही प्रतिमा नवरदेवसोबत घेऊन फिरल्यास वाईट नजरेपासून त्याचे संरक्षण होते, अशी श्रद्धा आहे. तसेच लग्न समारंभ निर्विध्न पार पडते.

'रामन दिवो' गुजराती लग्नात महत्वाचा भाग आहे. लग्नात नवरदेवाची आई 'रामन दिवो' आपल्या हात घेऊन सहभागी होते. त्याच्यासोबत सर्व अनुष्ठान करते आणि मंगल कामना करते.

दिवो हा मंगलदीपचा एक प्रकार आहे, जो गुजराती लोकांच्या प्रत्येक शुभ कार्यात वापरला जातो. कोणतीही पूजाविधी असो वा दिवाळी, तसेच मुलाच्या जन्माच्या वेळी हे दिवे घरात लावले जातात. त्यामुळे गणपतीच्या कृपेने घरात रिद्धी-सिद्धी वास करतात. घरात सुख-समृद्धी येते.