
केरळमधील वायनाडमध्ये भुस्खलन झालं अन् यात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री डोंगर कोसळल्याने चुरालमाला, मुंडाक्कई या भागात मोठं नुकसान झालं आहे. या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वायनाडमधील भुस्खलन झालेल्या या भागात काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसंच स्थानिकांशी संवाद साधला.

वायनाडमधील भुस्खलनाने मन हेलावलं आहे. या दृश्यांचा साक्षीदार होताना माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. या कठीण काळात प्रियांका गांधी आणि मी वायनाडच्या लोकांसोबत उभे आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.

आपत्तीग्रस्तांना मदत केली जावी. बचावकार्य लवकरात लवकर व्हावं आणि आपत्तीग्रस्तांचं पुनर्वसन व्हावं, याकडे आम्ही बारकाईने लक्ष देऊन आहोत. सर्व आवश्यक सहाय्य केलं जाईल, याची काळजी घेत आहोत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी शक्य ते सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भूस्खलनाच्या आणि नैसर्गिक आपत्तींच्या घटना वारंवार घडत आङेत. या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे, असं राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.