
दीड महिना मंत्री होऊन झाला, एक वेगळा अनुभव मिळाला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यावर आपण नवीन मंत्री झालो अस वाटलं नाही - हे राज्यातील जनतेचं पद आहे

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपचे सर्व नेते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. मी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.

मी काम करु शकतो हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. मला मिळालेलं पद हे जनतेचं पद आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करायाला निघालेल्यांना सांगू तुमचा काळ संपला, राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार येणार, असं नारायण राणेंनी सांगितलं.

मला मंत्री होऊन दीड महिना झाला, एक वेगळा अनुभव मिळाला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यावर आपण नवीन मंत्री झालो असं वाटलं नाही. हे राज्यातील जनतेचं पद आहे, अशी भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली.

जनआशीर्वाद यात्रेत कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन नारायण राणे यांनी केलं.

येणाऱ्या मुंबई महानगरापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही. येत्या काळात जनता तुम्हाला जागा दाखवेल. तुमची साथ अशीच लाभू द्या. जनता महाविकास आघाडीच्या, शिवसेनेच्या कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेतून हद्दपार करा, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं. मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचं जंगी स्वागत केलं. यावेळी राणेंनी सेनेवर हल्लाबोल केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी "जन आशीर्वाद यात्रेला वरुन राजाचा सुद्धा आशीर्वाद आहे. मंत्रिमंडळाला भौतिक, सामजिक प्रतिनिधित्व मिळालं. देशातील कर्तृत्ववान लोकांचा समावेश झाला आहे" असं नमूद केलं.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात सध्या वसुलीची कामे सुरु आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.