जेवल्यानंतर लगेच झोपता ? थांबा ! फक्त 10 मिनिटांचा वॉक ठरेल गेमचेंजर, मिळतील मोठे फायदे
सध्याच्या तिशय फास्ट, धावपळीच्या जगात लोकांकडे प्रत्येक कामासाठी वेळ असतो; मात्र स्वतःच्या आरोग्यासाठी अगदी 10 मिनिटंदेखील बऱ्याच लोकांकडे नसतात. त्यामुळे अनेक लोकांना लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांनी घेरल्याचं दिसून येत. रात्री ऑफीसमधून आलं की जेवलं आणि लगेच बेडवर जाऊन झोपायचं अशी सवय अनेकांना असते. पण ही छोटीशी चूक शरीरासाठी किती धोकादायक ठरू शकते याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का ?

आजकाल लोकांचं आयुष्य एवढं बिझी झालंय की त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळच उरत नाही. याच कारणामुळे बऱ्याच लोकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या वाढत आहेत. कोणी लठ्ठपणामुळे त्रस्त तर कोणाला हाय बीपीचा त्रास.पण यामागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. अनेक लोक हे रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपायला जातात, हे तुम्हीही पाहिलं असेल. पण जेवल्यानंतर लगेच अंथरुणावर जाणे आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते ? हा प्रश्न आहेच. जेवल्यानंतर दररोज फक्त 10 मिनिटे चालणं खूप गरजेचं आहे, त्या मिनिटांच्या वॉकचे भरमसाठ फायदे आहेत, जे अनेकांना माहीत नसतील. (All Photos : Social Media)
जेवल्यानंतर आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या जेवणानंतर फक्त 10 मिनिटं जरी चाललात ना तरी स्नायू रक्तातील ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करू लागतात. त्यामुळे रक्तातील साखरेची अचानक वाढ (ब्लड शुगर स्पाइक) कमी होण्यास मदत होते आणि इन्सुलिन सेन्सिटीव्हिटीमध्ये सुधारणा होऊ शकते. टाइप-2 मधुमेह असलेल्या आणि प्री-डायबेटीसचा सामना करणाऱ्या लोकांसाठी चालण्याची ही सवय खूप फायदेशीर ठरू शकते.
एवढंच नव्हे तर जेवणानंतर थोडा वेळ जरी चाललं ना तर पोट आणि आतड्यांमधील हालचाल (संकुचनाची प्रक्रिया) सुरळीत होऊ शकते. त्यामुळे अन्न पचनसंस्थेत पुढे जाण्यास मदत होते. थोडा वेळ चालल्यामुळे गॅसे, ॲसिडिटी, पोट फुगणे (ब्लोटिंग) किंवा अपचनाचा त्रास असलेल्या लोकांचा त्रास बराच कमी होऊ शकतो. त्यांना आराम मिळू शकतो.
जे लोक जेवल्यावर लगेच बेडवर जाऊन झोपतात, त्यांच्या पोटातील जे ॲसिड असतं ते अन्ननलिकेकडे वर येण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अॅसिडिटी हा त्रास होऊ शकतो. पण 10 मिनिटं का होईना, थोडं चालल्याने गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे अन्न आणि पोटातील आम्ल पोटातच राहण्यास मदत होते. मात्र, 10 मिनिटांच्या चालण्याने फार मोठ्या प्रमाणात कॅलरी जळत नाहीत; तरीही नियमित हलकी शारीरिक हालचाल केली तर त्यामुळे मेटाबॉलिझम सक्रिय राहण्यास मदत होते. मुळात रात्रीच्या वेळी शारीरिक हालचाल कमी होत असल्याने ऊर्जा खर्चही कमी होतो. हलकं का होईना चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
थोडंसं चालल्याने माणसाचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. याशिवाय, चालण्यामुळे शरीरात एंडॉर्फिनसारखी ‘फील-गुड’ रसायनं देखील सक्रिय होतात, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. अन्नाचे पचन सुरळीत होण्यास मदत मिळाल्याने आणि मन शांत झाल्याने रात्री अधिक चांगली व आरामदायक झोप लागण्याची शक्यता वाढते.