‘मुरांबा’मधील 7 वर्षांच्या लीपनंतर रमाचा नवा लूक; तुम्हीही व्हाल अवाक्!
'मुरांबा' या मालिकेच्या पुढील भागांमध्ये रमाची आणि तिच्या लेकीची भेट होणार का? रमा – अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणा आहे. 'मुरांबा' ही मालिका दुपारी 1.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर.

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'मुरांबा'मध्ये नवा अध्याय सुरु झाला आहे. या मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय दुरावले.

अक्षयने आपली लेक आरोहीसोबत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. तर तिकडे रमा पाचगणीमध्ये नवी ओळख बनवू पाहतेय. आतापर्यंत रमाला आपण दोन वेण्यांमध्ये पहात आलोय. पण लीपनंतर रमाचा नवा लूक समोर आलाय.

रमाने आता सगळा भूतकाळ मागे सोडून नवीन आयुष्य जगायचं ठरवलं आहे. भूतकाळाशी असणारी नाळ तोडण्यासाठी तिने आपल्या दोन वेण्या कापल्या आहेत. रमा पाचगणीतल्या सगळ्यात मोठ्या शाळेची ट्रस्टी आहे.

आधी पेक्षा जास्त खंबीर आणि इंग्रजी भाषेवर कमालीचं वर्चस्व असणारी एक नवी रमा आता जगासमोर आहे. रमा जरी भूतकाळ विसरली असली तरी आपल्या मुलीला मात्र ती कधीच विसरली नाही.

लेकीपासून दुरावल्यानंतर रमाने गोड खाणं सोडलं आहे. ती सगळ्यांना गोड खायला घालते. पण ती स्वतः खात नाही. आपल्या लेकीला तिने बबडू असं नाव दिलं आहे.