‘हिरामंडी’मधील भूमिकेमुळे तुफान ट्रोल, सुपरफ्लॉप ठरल्यानंतर अब्जाधीशाशी लग्न; कुठे गायब झाली अभिनेत्री?
संजय लीला भन्साळी यांच्या बिग बजेट 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये या अभिनेत्रीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र कमकुवत अभिनयकौशल्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चेहरे आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. त्यापैकी काही पहिल्याच चित्रपटापासून लोकप्रिय ठरतात, तर काहींना आपलं स्थान निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. अशाच एका अभिनेत्रीने सर्वांत मोठ्या वेब सीरिजमधून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं नाही तर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. त्यांच्या 'हिरामंडी' या बहुचर्चित वेब सीरिजमध्ये या अभिनेत्रीने भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. सीरिजमध्ये सर्वाधिक ट्रोलिंग याच अभिनेत्रीची झाली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सहगल आहे.

भन्साळींची भाची असल्याने या सीरिजमधून ती रातोरात स्टार होईल, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात आलमजेबच्या भूमिकेत तिचं अभिनयकौशल्य पाहून प्रेक्षकांनी तिच्यावर आणि भन्साळींच्या निवडीवर टीका करण्यास सुरुवात केली. सीरिजमधील तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि अभिनय पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत होते.

इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये शर्मिनला फक्त भन्साळींची भाची असल्यामुळेच भूमिका मिळाल्याची टिप्पणी अनेकांनी त्यावेळी केली होती. या ट्रोलिंगमुळे ती खूप खचली होती. या घटनेनंतर ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. नंतर ती कधीच पापाराझींसमोरही आली नाही. शर्मिनने प्रियकर आणि अब्जाधीश बिझनेसमन अमन मेहताशी लग्न केलं. नोव्हेंबर 2023 मध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.

अमन सध्या टॉरेंट फार्मास्युटिकल्समध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे. अमन हा अब्जाधीश उद्योगपती समीर मेहता यांचा मुलगा आहे. त्याचे वडील समीर मेहता यांची एकूण संपत्ती तब्बल 6.44 अब्ज डॉलर्स इतकी आहे.