
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत लवकरच श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये मुळशीमधील अनेक उद्योजक सहभागी होणार असून जानकी - ऋषिकेश, ऐश्वर्या - सारंग आणि अवंतिका - सौमित्र देखील सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेतील विजेत्या जोडीला 25 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुळशीमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्री आणि सौ स्पर्धेत वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. मात्र ते टास्क कोणते असतील याची कल्पना मात्र ऐनवेळी देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा नक्कीच आव्हानात्मक असेल. पहिली फेरी पाककला स्पर्धा असणार आहे. जानकी सुगरण आहेच, मात्र ही फेरी जानकी जिंकू नये म्हणून ऐश्वर्याने पूर्ण बंदोबस्त केला आहे. त्यामुळे श्री आणि सौ स्पर्धेची पहिली फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा खास प्रसंग शूट करण्यासाठी कलाकारांसोबतच मालिकेची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. भर उन्हात शूट करण्याचं आव्हान तर होतंच पण त्यासोबत संवाद पाठ करता करता पदार्थ बनवण्याचीही कसरत सुरु होती.

दिग्दर्शक राहुल लिंगायत यांनी उत्तमरित्या हा सीन कलाकारांना समजावला आणि हा सीन साकारण्यासाठी कलाकारांनीही कंबर कसली.