
आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. तसेच पाच राखीव खेळाडूही जाहीर केले आहेत. पण सूर्यकुमार यादव कोणत्या 11 खेळाडूंना पसंती देईल, याची उत्सुकता आहे. असं असताना माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने प्लेइंग 11 चे फासे टाकले आहेत.

अजिंक्य रहाणेने सलामीसाठी उपकर्णधार शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना पसंती दिली आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी तिलक वर्माला निवडलं आहे. तर चौथ्या क्रमांकाची पसंती कर्णधार सूर्यकुमार यादवला दिली आहे. पाचव्या क्रमांकासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याची निवड केली आहे.

सहाव्या क्रमांकावर संजू सॅमसनऐवजी यष्टीरक्षक जितेश शर्माला स्थान दिलं आहे. जितेशने आयपीएल 2025 स्पर्धेत फिनिशर म्हणून चांगली भूमिका बजावली होती. त्यामुळे संजू ऐवजी त्याची निवड केली. तर सातव्या क्रमांकावर अष्टपैलू अक्षर पटेलला पसंती दिली आहे.

प्लेइंग 11 मधून संजू सॅमसनला बाहेर करताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, 'आता गिल परतला आहे. त्यामुळे अभिषेकसोबत तो सलामीला उतरेल. वैयक्तिकरित्या मला संजूला संघात पाहायचं आहे. कारण त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण माझ्या मते, संजूला कदाचित वगळावं लागेल.'

"या आशिया कपमध्ये मला जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग एकत्र गोलंदाजी करताना पहायचे आहे," असं अजिंक्य रहाणे म्हणाला. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला संधी दिली आहे. तर वरुण चक्रवर्ती किंवा हर्षित राणा यापैकी एका खेळाडूला संधी मिळेल, असं सांगितलं आहे.

अजिंक्य रहाणेने निवडलेली प्लेइंग 11 : शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती / हर्षित राणा. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क कन्नडवरून)