
एशियन गेम्स 2023 च्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना मलेशियाशी झाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकला नाही. असं होऊनही टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

भारताने 15 षटकात 2 गडी गमवून 173 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, मलेशियाला 2 चेंडूत फक्त एक धाव करता आली आणि पावसाने हजेरी लावली. गुणांकनाच्या आधारावर भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं.

भारतीय कर्णधार स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या विकेटसाठी शफाली आणि जेमिमा यांच्यात 86 धावांची भागीदारी झाली. यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.

शफाली वर्मा हीने 39 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. यासह तिने काही विक्रमांची नोंद केली. एशियन गेम्समध्ये भारताकडून पहिलं अर्धशतक ठोकणारी फलंदाज ठरली आहे.

शफाली वर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला गटात) सर्वात कमी वयात 50 षटकार ठोकणारी पहिली फलंदाज ठरली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिने ही कामगिरी केली आहे.

टी20 क्रिकेटमध्ये हा विक्रम रहमानुल्लाह गुरबाज याच्या नावावर होता. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी ही कामगिरी केली होती. शफाली वर्मा हीने 20 सामन्यात आतापर्यंत 53 षटकार मारले आहेत.