
बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीने मंगळवारी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. आता 1 अध्यक्ष आणि 4 सदस्यांची ही निवड समिती टीम इंडियासाठी खेळाडूंची निवड करणार आहेत.

अध्यक्ष अजित आगरकर यांच्याबाबत क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना या समितीतील इतर 4 सदस्य कोण आहेत, याबाबत माहिती नाही. या 4 सदस्यांमध्ये एक असाही सदस्य आहे, जो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू वर्ल्ड कपसाठी टीम कशी काय निवडू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सदस्यांबाबत आपण जाणून घेऊयात.

अजित आगरकर यांनी 191 वनडे, 26 कसोटी आणि 4 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आगरकर वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात. आगरकर यांना कोचिंगसह ज्यूनिअर लेव्हलवर टीम सेलेक्शनचा तगडा अनुभव आहे.

सुब्रतो बॅनर्जी यांनी बंगालसाठी क्रिकेट खेळलंय. तसेच टीम इंडियाकडून 1 टेस्ट आणि 6 वनडे मॅचेसही खेळल्या आहेत. सुब्रतो बॅनर्जी हे बॉलिंग ऑलराउंडर आहेत. बॅनर्जी सेंट्रल झोनचे प्रतिनिधित्व करतात.

श्रीधरन सरथ हे निवड समितीत साऊथ झोनचं प्रतिनिधित्व करतात. सरथ यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र 139 फर्स्ट क्लास, 116 लिस्ट ए सामने खेळले आहेत. सरथ यांनी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये अनुक्रमे 8 हजार 700 आणि 3 हजार 366 धावा केल्या आहेत.

शिवसुंदर दास यांनी टीम इंडियासाठी 23 कसोटी 4 वनडे सामने खेळले आहेत. दास यांनी कसोटीत 1 हजार 326 धावा केल्या आहेत. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 हजार 908 धावांची नोंद आहे. दास हे निवड समितीत ईस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात.

आधी क्रिकेटर आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणारे सलिल अंकोला हे निवड समितीत वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात. सलील अंकोला यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. अंकोला यांनी टीम इंडियाकडून 1 टेस्ट आणि 20 वनडे सामने खेळले आहेत.