T20I World Cup 2024 : आयीसीसीच्या या नियमामुळे वाद होण्याची शक्यता!
T20 World Cup 2024 स्पर्धेची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे. मात्र आयसीसीचा एका निर्णय हा डोकेदुखी ठरतोय. जाणून घ्या.

आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएसए आणि वेस्ट इंडिजकडे आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेआधी आयसीसीच्या एका निर्णयामुळे संघांची डोकेदुखी वाढलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत दुसरा उपांत्य आणि अंतिम सामन्यात केवळ 1 दिवसाचं अंतर आहे.

सेमी फायनल आणि फायनलबाबत वाद वाढतोय. दुसऱ्या सेमी फायनल मॅचसाठी राखील दिवसाची तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र गरजेच्या वेळेस वाढीव वेळ देण्यात येणार आहे.

साखळी फेरीत एकूण 20 सहभागी संघ आमनेसामने भिडतील. त्यानंतर सुपर 8 चा थरार रंगेल. या सुपर 8 मधील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येणार आहे. पहिला सेमी फायनल सामना हा 26 जून रोजी होणार आहे. या पहिल्या सेमी फायनलमध्ये पहिल्या ग्रुपमधील नंबर 1 टीम आणि दुसऱ्या गटातील नंबर 2 टीम आमनेसामने असणार आहेत. या पहिल्या सेमी फायनलसाठी 27 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

दुसरी सेमी फायनल मॅच 27 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सामन्यात पाऊस किंवा इतर कारणामुळे व्यत्यय आला तर 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळेल. अर्थात या दुसऱ्या सेमी फायनलसाठी राखीव दिवस नाही.

टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला उंपात्य फेरीतील सामना हा 26 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरु होईल. तर दुसऱ्या सेमी फायनल मॅचची सुरुवात सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी होईल.

आयसीसीचा दुसरा उंपात्य फेरीतील सामना हा 27 जून रोजीच निकाली काढण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण 29 जूनला अंतिम सामना असल्याने 28 जूनला फायनल टीमला प्रवास करायचा असणार आहे.