
आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. जवळपास 1 लाख प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी मैदानात हजर असतील. तसेच मान्यवरांची उपस्थितीही असेल.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला 12 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. भारताने विजय मिळवल्यास बीसीसीआयला कोट्यवधींची रक्कम मिळणार आहे. यामुळे बीसीसीआयच्या तिजोरीत चांगलीच भर पडेल.

आयसीसीने अंतिम विजेत्या संघासाठी 40 लाख डॉलर म्हणजेच 33.25 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. ही संपूर्ण रक्कम बीसीसीआयच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर बीसीसीआय ही रक्कम विश्वचषक खेळलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना वाटेल.

बीसीसीआय संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बोनस देखील देण्याची शक्यता आहे. बीसीसीआय विराट कोहली, मोहम्मद शमी आणि रोहित शर्माला विशेष मानधन देऊ शकते.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असल्याने इतर माध्यमातूनही बीसीसीआयची मिळकत झाली आहे. तिकीट विक्री आणि टीव्ही डिजिटल अधिकारांसह इतर स्रोतातून प्रायोजकत्व मिळालं आहे.

आयसीसीच्या घोषणेनुसार, उपविजेत्या संघाला 20 लाख डॉलर म्हणजेच 16.62 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत संघाला 6.65 कोटी रुपये, तर गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघांना 83.12 लाख रुपये मिळतील. तर ग्रुप स्टेज मॅच जिंकणाऱ्या प्रत्येक संघाला 33.25 लाख रुपये बक्षीस मिळेल.