
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होणार आहे. 27 सप्टेंबरपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा विक्रम मोडीत काढू शकतो. यासाठी त्याला फक्त 7 धावांची गरज आहे. यानंतर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत गौतम गंभीरला मागे टाकेल.

रोहित शर्माला ही संधी पहिल्या कसोटी सामन्यातच होती. पण दोन्ही डावात रोहित शर्मा फेल गेला. दोन्ही डावात एकूण 11 धावा केल्या. पण दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माकडून फार अपेक्षा आहेत.

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या कसोटी कारकिर्दित भारतासाठी 58 सामने खेळला आहे. यात त्याने 104 डावात 4154 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 9 शतकांसह 22 अर्धशतकांची नोंद केली आहे.

रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त 7 धावा करताच गंभीरला मागे टाकेल. रोहित शर्माने टीम इंडियासाठी 60 कसोटी सामन्यात 103 डावात 4148 धावा केल्या आहेत.

रोहित शर्माच्या रडारवर अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयाचाही विक्रम आहे. रहाणे आणि विजयने 12 कसोटी शतकं झळकावली आहेत. रोहितच्या नावावरही 12 शतकं असून एक शतक झळकवल्यानंतर यांच्या पुढे निघून जाईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)