
भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून 1-1 ने बरोबरी आहे. त्यामुळे तिसऱ्या सामना निर्णायक असणार आहे. कारण हा सामना जो संघ गमवेल त्याला कमबॅकसाठी पुढचे दोन सामने झगडावं लागणार आहे. त्यामुळे राजकोटमधील तिसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात पाच मोठे रेकॉर्डही नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

राजकोटमधील तिसरा कसोटी सामना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या कारकिर्दितील 100 वा कसोटी सामना असणार आहे. नाणेफेकीचा कौल होताच बेन स्टोक्स 100 कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत बसणार आहे.

100 हून अधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे आहेत. दोन्ही संघाच्या 15-15 खेळाडूंनी ही किमया केली आहे. आता बेन स्टोक्स 16 वा खेळाडू असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला याबाबतीत मागे टाकणार आहे.

रोहित शर्मा राजकोटमधील सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड याचा एक विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. राहुल द्रविडने 25 कसोटीत 8 सामने जिंकले आहेत. तर रोहित शर्माने आतापर्यंत 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकताच राहुल द्रविडची बरोबरी करणार आहे.

आर अश्विन तिसऱ्या कसोटी 500 विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज होण्याच्या वेशीवर आहे. फक्त एक विकेट घेताच हा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. 97 सामन्यात 500 विकेटचा टप्पा गाठणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान त्याला मिळणार आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर कसोटीत 695 विकेट्स झाल्या आहेत. तिसऱ्या कसोटी पाच विकेट घेताच 700 गडी टिपणारा गोलंदाज ठरणार आहे. अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला आणि जागतिक स्तरावरील तिसरा गोलंदाज ठरेल. शेन वॉर्नने 708 आणि मुथय्या मुरलीधरनने 800 विकेट्स घेतल्या आहेत.