IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांचा संताप, स्पष्टच सांगितलं की…
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची परिस्थिती एकदम वाईट झाली आहे. चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. कोलकात्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने रनरेटवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग भडकला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमवून 272 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सला 17.2 षटकात 166 धावांवर रोखलं. विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवव्या स्थानावर घसरला आहे. तसेच नेट रनरेटवरही परिणाम झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 106 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रिकी पॉन्टिंग म्हणाला की, सामन्याच्या पूर्वार्धात संघाची कामगिरी पाहून मला लाज वाटली.

'सध्या त्याची समीक्षा करणे कठीण आहे. आम्ही एकूण 17 वाइड चेंडू टाकले. त्यामुळे षटके वेळेवर पूर्ण होऊ शकली नाहीत. 20 षटके पूर्ण करायला आम्हाला दोन तास लागले. आम्ही पुन्हा दोन षटके मागे पडलो. त्याचा फटका शेवटच्या दोन षटकांमध्ये बसला. 30 यार्ड सर्कलबाहेर फक्त चार खेळाडूंना क्षेत्ररक्षण करावे लागले.', असं रिकी पॉन्टिंग म्हणाला.

"आमच्या संघाने या सामन्यात अनेक चुका केल्या ज्या अस्वीकार्य आहेत. आम्ही संघात याबाबत चर्चा करू आणि लवकरच सुधारणा करू. संघाशी मुक्तपणे संवाद साधणे महत्त्वाचे आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टींवर चर्चा करावी लागेल.", असंही रिकी पॉन्टिंग पुढे म्हणाला.

पॉन्टिंगकडे खेळाडूंच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार पंतचा डीआरएसचा चुकीचा वापर. या सामन्यात गोलंदाजांनी पंत, सुनील नरीन आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या विकेटबाबत डीआरएसची विनंती केली, पण पंतने ती विनंती धुडकावून लावली.

सुनील नरीनने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आणि 85 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ पुरता हतबल झाला. दुसरीकडे, पंतने गोलंदाजांना योग्य प्रकारे वापरही केला नाही. त्यामुळे कोलकात्याला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.