
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात इशान किशनने जबरदस्त कामगिरी केली. इशान किशनने 39 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. इशानने ऋषभ पंतचा खास विक्रम मोडीत काढला आणि भारतीय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून नवा विक्रमही रचला आहे.

भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता इशानच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चार षटकार मारले होते.

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशानचे हे दुसरे अर्धशतक आहे. धोनी आणि पंत यांच्यासोबतच तो आता 2 अर्धशतके करणारा तिसरा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. यष्टिरक्षकाची भूमिका बजावताना आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावणारा केएल राहुल पहिल्या स्थानावर आहे.

इशानने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16 डावांनंतर अर्धशतक झळकावले. आतापर्यंत त्याला केवळ सातवेळा दुहेरी आकडा गाठता आला. त्यामुळे या सामन्यातील 58 धावांची ही खेळी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यास नक्कीच मदत करेल.