
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तिन्ही फॉर्मेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. वनडे, टी 20 आणि टेस्टमध्ये जेतेपद मिळवणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या कामगिरीनंतर क्रीडा वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात पाकिस्तानचे माजी खेळाडूही पाठी नाहीत. पण अभिनंदन करताना भारताला आणि खासकरून विराटला डिवचण्याची संधी सोडली नाही.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, "अभिनंदन ऑस्ट्रेलिया...या विजयाचे तुम्हीच हकदार आहात."

टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने अशीच पोस्ट टाकून इंग्लंड संघाचे अभिनंदन केले होते.

बाबर आझमने त्याच पोस्टचा संदर्भ देत आता विराट कोहलीला डिवचल्याचं बोललं जात आहे.

विराट कोहली आणि बाबर आझम यांनी केलेल्या पोस्टमध्ये फक्त संघाचं नाव आणि टीमचा फोटो बदलेला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने थम्ब दाखवला होता. तर बाबर आझमने स्माईली टाकली आहे.