इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिलक वर्मा हॅटट्रीक नोंदवणार, कसं काय ते जाणून घ्या
टी20 क्रिकेटमध्ये तिलक वर्मा हा भारताचा भविष्यातील स्टार खेळाडू आहे. तिलक वर्माने याची झलक मागच्या टी20 मालिकेत दाखवून दिली आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पुन्हा एकदा त्याच्याकडे मोठी संधी आहे. तिलक वर्माने या सामन्यात शतक ठोकल्यास एक नवा इतिहास रचला जाईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका बुधवारपासून सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा स्टार खेळाडू तिलक वर्माला इतिहास रचण्याची संधी आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्यापपर्यंत कोणत्याही फलंदाजाने सलग तीन शतकं ठोकलेली नाहीत. आता तिलक वर्मा हा दुर्मिळ विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शेवटच्या दोन सामन्यात बॅक टू बॅक शतक ठोकलं होतं.

सेंच्युरियन स्पोर्ट्स पार्कवर झालेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात तिलक वर्माने 56 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकाराच्या मदतीने नाबाद 107 धावा केल्या होत्या.

जोहान्सबर्गच्या वांडर्स मैदानावर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात 47 चेंडूत 10 षटकार आणि 9 चौकाराच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता तिसरं ठोकण्याची संधी आहे.

तिलक वर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 मालिकेत शतकी खेळी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरेल. आता तिलक वर्मा हा दुर्मिळ विक्रम करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.