शिमला-मनालीला टक्कर देतात भारतातील ही 4 हिल स्टेशन, पर्यटकांना मिळते शांतता आणि समाधान
गर्दी, आवाज आणि व्यापारीकरणापासून दूर राहून निसर्गाच्या सान्निध्यात जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर पुढील पाच हिल स्टेशन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जिथे तुम्हाला केवळ निसर्गरम्य वातावरण नाही तर खऱ्या अर्थाने शांतता आणि समाधानही मिळेल.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर वाढती गर्दी आता पर्यावरणावर ताण आणू लागली आहे. अशा परिस्थितीत शांतता, निसर्ग आणि निवांत वेळ शोधणाऱ्या पर्यटकांसाठी काही हिल स्टेशन उत्तम पर्याय ठरत आहेत. चला जाणून घेऊया अशाच 4 सुंदर आणि शांत ठिकाणांबद्दल.

सेराज व्हॅलीमध्ये असलेले शोजा हे एखाद्या परीकथेतल्या गावासारखं भासणारं ठिकाण आहे. दाट जंगलं, धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत वातावरण हे याचं वैशिष्ट्य. इथे गजबजलेल्या कॅफे किंवा मॉल्स नाहीत पण लाकडी कॉटेज आणि सुंदर ट्रेकिंग रूट्स जरूर मिळतात.

ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कजवळ असलेली तीर्थन व्हॅली निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. स्वच्छ नदीकिनारे, ट्राउट मासेमारी आणि शांत असणारे हे ठिकाण खास बनतं. इतर हिल स्टेशनच्या तुलनेत कमी व्यापारीकरण असल्याने इथे खऱ्या अर्थाने निवांतपणा अनुभवता येतो.

उत्तराखंडमधील एक लपलेलं रत्न म्हणजे चकराता. दाट जंगलं, अप्रतिम दृश्यं आणि प्रसिद्ध टायगर फॉल्स यामुळे हे ठिकाण खास आहे. मसुरीच्या तुलनेत कमी गर्दी असल्याने शांततेचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे 8500 फूट उंचीवर वसलेलं कनाताल ताज्या हवेसाठी आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखलं जातं. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.