बघू नंतर भरु म्हणत चलन दुर्लक्षित करताय… मग गाडी होईल जप्त, वाहतूक पोलिसांचा नियम काय?
वाहतूक दंड न भरल्यास पोलीस तुमची गाडी जप्त करू शकतात का? गुरुग्राममध्ये एका फॉर्च्युनर कारवर ८३,५०० रुपयांचा दंड प्रलंबित असल्याने पोलिसांनी ती जप्त केली आहे. मोटार वाहन कायद्याचे नियम आणि ई-चलन न भरल्यास कोणत्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात.

अनेकदा वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. यानंतर ट्राफिकच्या चलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बघू नंतर भरू ही अनेकांची मानसिकता असते. मात्र आता हीच मानसिकता एका फॉर्च्युनर कार मालकाला भलतीच महागात पडली आहे.

गुरुग्राममध्ये पोलिसांनी एका आलिशान फॉर्च्युनर एसयूव्हीवर तब्बल ८३,५०० रुपयांचा प्रलंबित दंड आणि १० प्रलंबित चलन असल्यामुळे ती थेट जप्त केली आहे. या फॉर्च्युनर वाहनावर गेल्या काही काळापासून ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक-दोन नव्हे, तर तब्बल १० चलान प्रलंबित होती.

बराच काळ लोटूनही वाहन मालकाने हा दंड भरण्याची तसदी घेतली नाही. अखेर वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicle Act) कलम १६७(८) अन्वये कारवाई करत वाहन जप्त केले.

आताच्या डिजीटल युगात हायटेक कॅमेरे आणि ऑनलाईन प्रणालीमुळे आता वाहतूक पोलिसांचे प्रत्येक वाहनावर बारीक लक्ष असते. तुमचे चलान कधी आणि कुठे फाडले गेले, याची सर्व नोंद ऑनलाईन उपलब्ध असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना गुंगारा देणे आता अशक्य झाले आहे.

जर तुम्ही वेळेत वाहतूक चलन भरले नाही, तर केवळ दंडच वाढतो असे नाही, तर खालील कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मोटार वाहन कायद्यानुसार, वारंवार चलनाकडे दुर्लक्ष केल्यास पोलीस तुमचे वाहन जप्त करू शकतात.

हे प्रकरण न्यायालयात (Court) जाऊ शकते, जिथे तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच वाहनांची कागदपत्रे नूतनीकरण करणे (RTO processing) किंवा वाहन विकताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे, वाहतूक नियमांचे पालन करा आणि ई-चलन आले असल्यास ते वेळेत भरा, जेणेकरून तुमचे वाहन जप्त होण्याची वेळ येणार नाही.