
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलन २०२३' या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जी यांच्यासमवेत उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत मांडले.

वीर महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत साहसी होते. महाराणा प्रताप सिंह यांनी आपल्या सवंगड्यांनादेखील युद्धाचे धडे दिले. धर्मनिष्ठा आणि स्वाभिमानाच्या जोरावर महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. या दोन्ही धर्मवीर राजांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत. राजपूत समाजातील अनेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ आहेत हेही अभिमानास्पद आहे.

हे आपले सरकार आहे. याच भावनेने अनेक मागण्या सरकारकडे केल्या गेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. सरकारी मदतीचे पंख लावून आम्ही तुम्हाला मुख्य प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही देतानाच, राजपूत समाजाच्या अगोदर लावण्यात येणारा भामटा हा शब्द काढून टाकण्यासाठी आपले सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी नमूद केले.

राज्यातील राजपूत समाजाला न्याय देण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा देखील निर्णय आम्ही लवकरच घेऊ असे याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. तसेच वीर महाराणा प्रतापसिंह यांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा छत्रपती संभाजी नगरमध्ये नक्की उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यासमयी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भूमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, जयकुमार रावल, श्रीमती श्वेता महाले आणि महाराणा प्रताप यांच्या शौर्याला आदर्श मानणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.