
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. निर्यात मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा माल परदेशात न जाता देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे.

याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

कालपर्यंत सुमारे 20 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 10 ते 12 रुपयांवर आला आहे. तर 40 रुपयांना विकले जाणारे कलिंगड 12 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दुसरीकडे बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. परिणामी पालेभाज्या, फळे आणि फुलांचा मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडगे यांनी सांगितले की, निर्यात बंद झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून ग्राहक कमी असल्याने मोठ्या प्रमाणात माल सडत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

दरम्यान, बाजारात मोठ्या प्रमाणात माल येत असला तरी विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.