
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत.

यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.


दिल्लीत वेगवेगळ्या भागात निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीतील संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागला आहे. त्यामुळे या परिसरातील वातावरण अधिकच तापलं आहे.

शेतकऱ्यांना 12 वाजता रॅली काढण्याची परवानगी देण्यात आलेली होती. पण त्याआधीच शेतकऱ्यांनी रॅलीला सुरुवात केली. ही रॅली रोखण्यात पोलिसांना अपयश आले. एवढेच नव्हे तर आंदोलक शेतकरी शेतकरी नेत्यांचंही काहीही ऐकत नसल्याचं चित्रं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सिंधु बॉर्डरवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून आंदोलकांना शांततेत रॅली करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा हा ताफा दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत.

शेतकऱ्यांमधील आणि पोलिसांमधील हा संघर्ष अजूनही सुरुच आहे.

याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंदोलकांवरुन बस आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.