सीजेपी आता मोठं पाऊल उचलणार? भाजपचंच नव्हे कॉंग्रेससह विरोधकांचं टेन्शन वाढणार? काय घेणार निर्णय?
सध्या देशात कॉकरोच जनता पार्टी ही चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला. आता भविष्यात ही पार्टी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. येथे जमलेल्या लाखो विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात राजकीय नेते आणि कलाकार देखील सहभागी झाले होते. काल धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. आता कॉकरोच जनता पार्टी पुढे काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.

केंद्र सरकारने आंदोलक तरुणांच्या मुख्य मागण्या मान्य केल्यानंतर थोड्याच वेळाने सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आपल्या भविष्यातील भूमिका स्पष्ट केल्या आहेत. हा गट पुढे राजकीय पक्ष बनू शकतो का, याबाबत त्यांनी चर्चा केली. जेव्हा कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या एका नेत्याला विचारले गेले की ते आता इथून पुढे पूर्णवेळ राजकारणात सहभागी होणार का? तेव्हा त्यांनी म्हटले, “भारतात कोणत्याही गोष्टीसाठी कधीही ‘नाही’ म्हणायचे नसते.” सीजेपी नेत्यांनी सध्या पूर्णवेळ राजकारणात येण्याची कोणतीही शक्यता फेटाळली आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांची प्राथमिकता तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलन मजबूत करणे ही आहे.

रांका यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “माझ्या मनात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे घरी जाऊन झोपणे, थोडा आराम करणे आणि आपल्या कुटुंबियांना भेटणे. मी गेल्या काही महिन्यांपासून घरापासून दूर होतो आणि खरंच फक्त आराम करायचा आहे. गेल्या दोन महिन्यांत जे काही घडले त्यावर विचार करायचा आहे. मला वाटते की ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा अभिमानाचा क्षण आहे. हा खरंच आनंद आणि दिलासा अनुभवण्याचा क्षण आहे आणि यानंतर आपण पाहू की पुढे काय होते.”

जेव्हा त्यांना थेट विचारले गेले की ते राजकीय कारकिर्दीची शक्यता फेटाळत आहेत का, तेव्हा सौरव दास यांनी जोर देऊन सांगितले की राजकारण हा या गटाचा तात्काळ उद्देश नाही.

दास म्हणाले, “आत्ता आमचे लक्ष पूर्णपणे स्पष्ट आहे. आम्हाला हे आंदोलन स्थानिक स्तरापर्यंत घेऊन जायचे आहे. ७५०-८०० राजकीय पक्ष अधिच अस्तित्वात आहेत. त्यापैकी एकही पक्ष तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही."