Aaditya Thackeray : चिंधी चोरांकडे लक्ष देऊ नका, मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

| Updated on: Aug 20, 2022 | 7:14 PM

Aaditya Thackeray : तुम्ही गद्दारी केली. तुम्हाला तिकडे राहायचं आहे. तिथे राहा. आता हे सांगत आहेत की 33 देशांनी आमच्या क्रांतीची नोंद घेतली. पण तुमच्या क्रांतीची दखल घेतली नाही. उलट तुमच्या गद्दारी आणि निर्लज्जपणाची दखल घेतली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Aaditya Thackeray : चिंधी चोरांकडे लक्ष देऊ नका, मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय; आदित्य ठाकरेंचा घणाघात
चिंधी चोरांकडे लक्ष देऊ नका, मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय; आदित्य ठाकरेंचा घणाघात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते. त्यामुळे अश्या चिंधी चोरांकडे लक्ष देऊ नका. मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसंवाद (shiv samvad) यात्रा आज जळगावात आली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या निमित्ताने जळगावमध्ये त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर कुणी तरी फाडल्याने शिवसैनिक (shiv sena) संतप्त झाले होते. या घटनेचा आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख करत पोस्टर फाडणाऱ्यांना चिंधी चोर म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर घणाघाती हल्ला चढवताना बंडखोरांना पुन्हा एकदा गद्दार संबोधत डिवचले.

राज्यात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या आमदारांची गद्दारी केली ते तुम्हाला मान्य आहे का? हेच तुम्हाला विचारायला आलोय, सांगायला आलोय, असं म्हणत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जळगावात शिवसैनिक आणि नागरिकांना संबोधित केलं. आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

गद्दारीचा कलंक कायम राहणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राचं सरकार पाडून गुवाहाटीला जिथे ओला दुष्काळ होता, तिथे तुम्ही मजा मारत होता. 40 जण गद्दारी करून गेले. ते स्वतःसाठी गेले. जनतेसाठी नाही. 50 थर लावले बोलतायात, 50 थर नाही 50 खोके लावलेत तुम्ही. एवढे खोके म्हणतात पण लोकांमध्ये ते आले का? नवीन काही घडलंय का? जनतेसाठी काही आलंय का? गेलेल्यांना काय मिळालं? उलट आधी चांगली खाती तरी होती. तुमच्या माथ्यावर गद्दारीचा कलंक कायम राहणार. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

एकही मुंबईकर मंत्री नाही

भाजपचं मुंबईवरील प्रेम फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यांचं मुंबईवर प्रेम असतं तर मुंबईतील मराठी माणूस त्यांनी मंत्री केला असता. पण एकही मुंबईकर मराठी माणूस मंत्री केलेला नाही. त्यामुळे त्यांचं मुंबईवरील प्रेम दिसून येत आहे, असा टोला आदित्य यांनी लगावला.

क्रांतीची नव्हे, गद्दारीची दखल घेतली

तुम्ही गद्दारी केली. तुम्हाला तिकडे राहायचं आहे. तिथे राहा. आता हे सांगत आहेत की 33 देशांनी आमच्या क्रांतीची नोंद घेतली. पण तुमच्या क्रांतीची दखल घेतली नाही. उलट तुमच्या गद्दारी आणि निर्लज्जपणाची दखल घेतली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काही गद्दार आमच्याकडून गेले. त्यांना वाटलं बरंच काही मिळेल. पण त्यांना फक्त बाबाजी का ठुल्लू मिळाला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.