कुठे रुमणे, कुठे घोंगडी भेट, आदित्य ठाकरेंचं यवतमाळमध्ये पारंपारिक स्वागत

| Updated on: Aug 29, 2019 | 1:07 PM

आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा यवतमाळ येथे पोहोचली. यवतमाळमध्ये आदित्य ठाकरेंचं अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यवतमाळकरांनी कुठे रुमणे, तर कुठे घोंगडी भेट देऊन त्यांचं उत्साहात स्वागत केलं.

कुठे रुमणे, कुठे घोंगडी भेट, आदित्य ठाकरेंचं यवतमाळमध्ये पारंपारिक स्वागत
Follow us on

यवतमाळ : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा (Jan Ashirvad Yatra) तिसरा टप्पा सुरु झाला आहे. ही यात्रा सध्या यवतमाळ येथे येऊन पोहोचली आहे. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याचंच एक उदाहरण आज यवतमाळ येथे पाहायला मिळाले. यवतमाळमध्ये आदित्य ठाकरेंचं अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यवतमाळकरांनी कुठे रुमणे, तर कुठे घोंगडी भेट देऊन त्यांचं उत्साहात स्वागत केलं (Aaditya Thackeray welcomed in traditional way).


आदित्य ठाकरे यांच्याकडे एक युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते माहाराष्ट्राच्या घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला यशही मिळत आहे. जनआशीर्वाद यात्रा ही मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरते आहे. या यात्रेचं निमित्त हे राजकीय नसून सामाजिक आहे, असं आदित्य सांगत असले, तरी शिवसेनेचे नेते त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या भावी राजकारणातील मंत्री म्हणून पाहू लागले आहेत. अनेक नेत्यांनी तर आपली ही इच्छा बोलूणही दाखवली.

या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंना अनेकदा शिवसेना-भाजप (Shivsena BJP) विधानसभा निवडणुकांना युतीमध्ये सामोरे जाणार का, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपद (CM and Deputy CM) आणि जागावाटपाचं काय, असे प्रश्न विचारले गेले. मात्र, आदित्य ठाकरेंनी या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं. आदित्य या प्रश्नांपासून दूर राहत असले, तरी शिवसेनेतील नेते आपली मतं स्पष्टपणे मांडत आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांनी तर आदित्य हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा असल्याचं सांगितलं. तर दिग्रसचे विद्यमान आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी आदित्य यांनी दिग्रसमधून लढावं असा आग्रह केला.

आदित्य यांनी दिग्रसमधून लढावं : संजय राठोड

जनआशीर्वाद यात्रा दिग्रस येथे पोहोचली. तेव्हा दिग्रसचे विद्यमान आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी आदित्य ठाकरेंना दिग्रस मतदारसंघातून निवडणुक लढवण्याचा आग्रह केला. इतकचं नाही, तर त्यांनी फक्त उमेदवारीचा अर्ज भरण्यास यावे, आम्हीच त्यांना सर्व विरोधी उमेदवारांचे डिपाॉझिट जप्त करून विजयी करू, असंही म्हटलं. मात्र, यावेळीही आदित्य यांनी प्रतिक्रिया न देणं पसंत केलं.

संजय राऊत यांच्या मनातला मुख्यमंत्री

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी हा महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला महत्वाचा निर्णय आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेतील. पण मला तुम्ही वैयक्तिक मत विचाराल, तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून तरुण, तजेलदार चेहऱ्याची गरज आहे. जो तरुण महाराष्ट्राला, तरुणांना दिशा देऊ शकतो. महाराष्ट्रतील लोकही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त दोन महिन्यांपूर्वी व्यक्त केलं होतं.

जन आशीर्वाद यात्रा राज्यात जिथे जाईल तिथे आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला जातो आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे या मागणीला मान्य करतील की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.