मुख्यमंत्रीपदासाठी अबू आझमींची पसंती कुणाला?

| Updated on: Nov 22, 2019 | 3:54 PM

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करणार हे आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे. त्यासाठी आता महाआघाडीच्या मित्रपक्षांशीही चर्चा करण्यात येत आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी अबू आझमींची पसंती कुणाला?
Follow us on

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करणार हे आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे. त्यासाठी आता महाआघाडीच्या मित्रपक्षांशीही चर्चा करण्यात येत आहे. या घटकपक्षांपैकी एक असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी (Abu Azmi on next CM of Maharashtra) देखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, सोबतच त्यांनी अनेक अटीही ठेवल्या आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन केल्यास मुख्यमंत्री कोण असावा (Abu Azmi on next CM of Maharashtra) यावरही भाष्य केलं.

अबू आझमी म्हणाले, “आज केंद्रात असं सरकार आहे ज्यांनी देशाला विभागणीच्या टोकावर नेले आहे. महाराष्ट्रात देखील तेच सरकार होतं. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला नाकारलं आहे. भाजपला 230-245 आमदार येतील असा प्रचंड अहंकार होता. मात्र, मागील 5 वर्षातील यांच्या सरकारच्या कारकिर्तीनंतर जनतेने भाजपला नाकारलं. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं. त्यांचं व्यक्तिमत्व मुख्यमंत्रिपदासाठी योग्य आहे, असं माझं मत आहे.”

आज आम्हाला बैठकीसाठी बोलावण्यात आलं. यात सर्व मित्रपक्षांची मतं जाणून घेतली. सर्वांनीच भाजपला सत्तेसाठी दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासोबत सरकार स्थापन करायला हवे, यासाठी सहमती दर्शवली. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. त्यांना वेगवेगळं करुनच आम्ही त्यांची ताकद कमी करु शकतो. आम्हाला असं धोरण घ्यायला हवं ज्यातून देशातील धार्मिक उन्माद संपेल. म्हणूनच शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले जात आहे, असंही आझमी यांनी नमूद केलं.

‘किमान समान कार्यक्रमासाठी मुद्दे मांडणार’

आझमी यांनी यावेळी किमान समान कार्यक्रमावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आज (22 नोव्हेंबर) सायंकाळ किंवा उद्या (23 नोव्हेंबर) सकाळपर्यंत सर्व पक्षांनी आपले मुद्दे मांडण्याचं ठरलं आहे. त्यानंतर त्यावर चर्चा होईल आणि मग सरकार स्थापनेचा निर्णय होईल. आत्ता सरकारमध्ये सहभागी होणं, न होणं अशी काहीही चर्चा झालेली नाही. आम्ही सरकारमध्ये सहभागी व्हावं, त्यात मंत्रिपद मिळावं, असंही अजिबात काही नाही.”

आम्हाला केवळ महाराष्ट्रात एक चांगलं सरकार हवं आहे. ते सरकार अल्पसंख्यांक, दलित आणि शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करेल आणि समाजातील कट्टरवादही नष्ट करेल. यावर ते सहमत झाले तर त्यांनी सरकार स्थापन करावे असं आमचं मत आहे. माध्यमांनीच मनाने मंत्रिमंडळ वाटप केलं आहे. असं काहीही नाही. अजून उद्धव ठाकरेंसोबत समोरासमोर चर्चा झालेली नाही. ही चर्चा आज होईल.

‘अबु आझमीला कोणत्याही मंत्रिपदाची गरज नाही’

अबू आझमीला कोणत्या मंत्रिमंडळाची गरज नाही, असं म्हणत आझमींनी मंत्रिपदाची अपेक्षा नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, सोबतच पाठिंबा देताना काही मागण्या असल्याचंही स्पष्ट केलं. आम्ही आमच्या मागण्या काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी स्वरुपात देणार असल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा हवा असेल तर त्यांना आपल्या धोरणात काही बदल करावा लागेल, असंही म्हटलं.

समाजवादी पक्षाच्या मागण्या

  • देशातील धर्मांधता संपावी
  • मंदीर-मशीद-हिंदू-मुस्लीम-लव्ह जिहाद, घर वापसी हे मुद्दे संपायला हवेत
  • काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचं सरकार आल्यावर इस्माईल युसुफ कॉलेज मुस्लिमांच्या ताब्यात देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण करावं. ती जमीन इस्माईल युसुफ यांनी अल्पसंख्यांकांसाठी खरेदी केली होती. त्यावर सरकारने कब्जा केला.
  • काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिमांना आरक्षण दिले, ते भाजपच्या काळात काढण्यात आले ते आरक्षण पुन्हा द्यावे.
  • वफ्फच्या जमिनी परत द्यायला हव्यात.
  • परप्रांतियांच्या विरोधातील आवाज बंद व्हावा.