हातातून सत्ता गेली तरी उद्धव ठाकरेंचे दौरे कशासाठी? आदित्य ठाकरेंनी कारण सांगितलं…

| Updated on: Oct 27, 2022 | 11:12 AM

सत्ता हातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे दौरे का करत आहेत? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. वाचा...

हातातून सत्ता गेली तरी उद्धव ठाकरेंचे दौरे कशासाठी? आदित्य ठाकरेंनी कारण सांगितलं...
Follow us on

मुंबई : आधी चांगला पाऊस पडला म्हणून बळीराजा खूश होता. मान्सून चांगला असल्याने पाण्याची कमतरता नाही, असं वाटू लागलं. वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला, आता पिकं चांगली येणार म्हणून शेतकरी आनंदी होता. पण बघता बघता परतीच्या पावसाने जोर धरला आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. अशात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नुकसानग्रस्त भागात दौरा करत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सत्ता हातून गेल्यानंतर ठाकरे हे दौरे का करत आहेत? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) उत्तर दिलंय.

आदित्य काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामागील कारण सांगितलं. आता जरी आम्ही विरोधीपक्षात असलो तरी राज्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेणं आमची जबाबदारी आहे. या जबाबदारीचं भान म्हणून आम्ही हे दौरे करतोय. शेतकऱ्यांसोबत त्यांच्या बांधावर उभे राहतोय. बळीराजा आज हवालदिल झालाय. त्याच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही आदित्य यांनी केली आहे.

मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत.महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारा आमच्या सरकार होतं. आताचं सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शिंदे सरकारचा फक्त घोषणायंत्र झालं आहे. फक्त घोषणाबाजी केली जाते. पण कुठल्याही घोषणेची अंमलबजावणी केली जात नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधलाय.

दहीहंडी असो वा शिधा वाटपाबाबत घोषणा आणि फक्त तारखा पाहायला मिळतात. कृषिमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन भेट देणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. राजकारण दूर ठेवा आणि आधी शेतकऱ्यांना मदत करा, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.