विजयाबाई गेल्या… रंगभूमी पोरकी झाली, नानांसह अनेकांना घडवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
मराठी कलाविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता ह्यांचं त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे.

मराठी कलाविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता याचं त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले अशा दिग्गज कलाकारांच्या यशामागे त्यांचे मोलाचे योगदान आहे. विजया मेहता यांनी ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रख्यात चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचे वृद्धापकालाने निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी समांतर सिनेमा आणि नाट्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला आहे. त्या ६० च्या दशकातील मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील एक प्रमुख व्यक्तीमत्व होत्या. त्यांच्या जाण्याने रंगभूमी पोरकी झाल्याचे म्हटले जात आहे.
विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी गुजरातच्या बडोदा येथे झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर दिल्लीत इब्राहिम अल्काझी आणि आदी मर्झबान यांच्याकडे नाट्यकलेचे शिक्षण घेतले. ६० च्या दशकात मराठी प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी आपली छाप पाडली. नाटककार विजय तेंडुलकर , अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या नाट्यगटात काम केले. त्या या गटाच्या संस्थापक सदस्य होत्या. मराठी रंगभूमीत त्यांना ‘बाई’ असे आदराने म्हटले जाते. त्यांच्या आत्मवृत्तपर पुस्तक ‘बाई’ या नावानेच काही वर्षांपूर्वी प्रकाशीत झाले होते. त्यांचे ‘एक शून्य बाजीराव’ हे सी. टी. खानोलकर लिखित नाटक भारतीय रंगभूमीवरील एक मैलाचा दगड मानले जाते.
पुरस्काराने गौरव
दिग्दर्शनातील उत्कृष्टतेसाठी विजया मेहता यांना १९७५ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर १९८६ मध्ये ‘राव साहेब’ (१९८६) मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यांनी दुर्गा खोटे यांचा मुलगा हरिन खोटे यांच्या विवाह केला होता. हरिन खोटे यांच्या अकाली निधा झाले. त्यांना हरिन खोटे यांच्या पासून दोन मुले झाली. त्यानंतर त्यांनी फर्रोख मेहता यांच्याशी दुसरा विवाह केला.
