मोठी बातमी! मविआ की महायुती? जनतेचा कौल कुणाच्या बाजूने, सत्तासंघर्षाच्या निकालाआधी ‘या’ निवडणुकीच्या निकालातून महत्त्वाची अपडेट

| Updated on: Apr 28, 2023 | 9:06 PM

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाआधी राज्यात महत्त्वाची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा काहीसा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबतचे अपडेटही आता समोर येत आहेत.

मोठी बातमी! मविआ की महायुती? जनतेचा कौल कुणाच्या बाजूने, सत्तासंघर्षाच्या निकालाआधी या निवडणुकीच्या निकालातून महत्त्वाची अपडेट
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल जाहीर होण्याआधी राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडतोय. विशेष म्हणजे राज्यातील आज वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 147 बाजार समित्यांचे मतदान आज पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी ही आज होतेय. विशेष म्हणजे अनेक बाजार समित्यांचे निकाल आता जाहीर होत आहेत. त्यापैकी यवतमाळमधील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल महत्त्वाचा आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीने मंत्री संजय राठोड यांना चांगलाच झटका दिला आहे. तर नाशिकमध्ये शेतकरी विकास पॅनलला चांगलं यश मिळताना दिसत आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून या अंतर्गत 147 बाजार समित्यांचे मतदान आज पार पडले. तर 88 बाजार समित्यांचे मतदान 30 एप्रिल रोजी होणार आहे. प्राधिकरणाने 21 मार्चच्या आदेशानुसार 253 कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 235 बाजार समित्यांसाठी मतदान होतंय.

कोणत्या बाजार समितीत कोणाची बाजू?

1) दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मविआची बाजी

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मविआ नेते संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजयी मिळाला आहे. या निवडणुकीत फक्त 4 जागी संजय राठोड गटाचे संचालक निवडून आले आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांचा मोठा विजय मानला जातोय.

हे सुद्धा वाचा

2) यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीची बाजी

यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीला 11 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीने गड राखण्यात यश मिळवलं आहे. तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपला पहिल्यांदाच बाजार समितीत 4 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली मविआला इथे विजय मिळाला आहे.

3) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बाजार समिती भाजपच्या ताब्यात

महागाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या नाईक परिवाराची सत्ता भाजपने उलथवली आहे. त्यामुळे आता भाजप-शिंदे गटाच्या युतीकडे बाजार समिती गेली आहे. महागावमध्ये भाजप 9 जागी, शिवसेना शिंदे गट 2 जागी तर काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा, असा निकाल समोर आला आहे. बाजार समितीत सत्तापालट करण्यात आमदार नामदेव ससाणेंना मोठं यश आलं आहे.

4) यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत युतीला झटका, मविआची बाजी

यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत भाजपचे आमदार अशोक उईके यांना धक्का बसला आहे. बाभूळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीला 13 तर भाजप-शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे.

5) अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश

अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांना चांगला विजय मिळाला आहे. या बाजार समितीत यशोमती ठाकूर यांच्या गटाला तब्बल 18 जागांवर यश मिळालं आहे. तर भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाला आहे. निकाल समोर आल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जल्लोष केला जातोय.

6) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा विजय

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय मिळाला आहे. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीला दिंडोरीतून विजयी मिळण्यास सुरुवात झालीय. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे.

7) नाशिक जिल्ह्यातील देवळामध्ये शेतकरी विकास पॅनलची सरशी

देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादीचे योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची सरशी बघायला मिळतेय. शेतकरी विकास पॅनलला सोसायटी आणि ग्रामपंचायत गटाच्या सर्व जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 7 जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.