Bharat Bhalke death | सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघासाठी झटणारा लोकनेता हरपला, अजित पवार गहिवरले

| Updated on: Nov 28, 2020 | 12:56 PM

आमदार भारत भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकनेता आज हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

Bharat Bhalke death | सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघासाठी झटणारा लोकनेता हरपला, अजित पवार गहिवरले
या वर्षी पंढरपुरात महापूर आल्यावर भालके यांनी पूरग्रस्त भागांची अनोख्या पद्धतीने पाहणी केली होती. पुरातून स्वत: होडी चालवून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता.
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे, तसेच अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Ajit Pawar pays homage to Bharat Bhalke)

“आमदार भारत भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी आणि मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, “भारतनानांचं नेतृत्वं हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरुप झालेलं नेतृत्वं होतं. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह या भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलं”.

“भारतनानांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही सातत्यानं आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारं त्यांचं नेतृत्वं होतं. भारतनाना भालके यांचं अचानक निघून जाणं ही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी काँग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

गेल्या काही दिवसांपासून भारत भालके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांचं पार्थिव पुण्यावरुन पंढरपूरकडे रवाना झालं. पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी 1.30 ते 3.45 या वेळेत त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 4.00 वाजता त्यांच्यावर सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. आमदार भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा जाणार आहेत. साधारण दुपारी 3 पर्यंत शरद पवार पंढरपुरात पोहोचतील.

शरद पवारांकडून श्रद्धांजली

“पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

“पंढरीच्या विठुरायाचा वारकरी भारत नाना आज अचानक निघून गेले ही बातमी खुप व्यथित करणारी आहे. नाना तुमच्या कडे पाहताक्षणी मुठभर मास वाढायचं. आपण अचानक EXIT घेऊन मनाला वेदना दिल्यात,” असे ट्वीट करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या 

Bharat Bhalke Funeral live : भारत भालके यांचं पार्थिवावर पंढरपूरकडे रवाना

Bharat Bhalke | हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता, भारत भालके यांची कारकीर्द

कार्यकुशल आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले, आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर शरद पवार हळहळले

(Ajit Pawar pays homage to Bharat Bhalke)