मी आरेला कारे म्हणणारा, हातात बांगड्या भरल्या नाहीत : अजित पवार

| Updated on: Oct 14, 2019 | 7:47 AM

मी आरे ला कारे म्हणणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना दम देणाऱ्यालाही बघतो आणि त्याच्या खानदानालाही बघतो' अशी ताकीद अजित पवारांनी अहमदनगरमधील सभेत दिली.

मी आरेला कारे म्हणणारा, हातात बांगड्या भरल्या नाहीत : अजित पवार
Follow us on

अहमदनगर : ‘मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो’ अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा नाव न घेता समाचार घेतला. अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात खर्डा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत (Ajit Pawar Rally for Rohit Pawar) ते बोलत होते.

‘काही जण मला सांगतात कर्जत जामखेडच्या परिसरात काही गटामध्ये काही दबाव आहे, काही दहशत आहे. आम्ही काय असं-तसं इथे आलोय काय? जे अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी करतील, ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात. हे त्यांनी विसरु नये. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत’, अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला. कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार विरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना आहे.

‘आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन. मी लोकशाही मानणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा आहे. मी घटना-कायदा मानणारा आहे. आमचे कार्यकर्ते जर नीट आचारसंहितेचं पालन करत असतील आणि कोण बाहेरचे आणले, तर मलाही जशास तसं उत्तर देता येतं.’ असं अजित पवार यांनी (Ajit Pawar Rally for Rohit Pawar) ठणकावून सांगितलं.

चाळीस वर्ष गवत उपटलं का? नाव न घेता पवारांचा मधुकर पिचडांना सवाल

‘मी आरे ला कारे म्हणणारा कार्यकर्ता आहे. मलाही महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीचं धाडस करु नये. कार्यकर्त्यांना कोणी दमदाटीची भाषा केली, तर मला सांगा. मग तो दम देणाराही बघतो आणि त्याच्या खानदानाला बघतो’ अशी ताकीदही अजित पवारांनी दिली.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टीकेचे लक्ष्य केले. निवडणुकीत समोर कोणताच विरोधक नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मग असं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा, गृहमंत्री अमित शाह यांना वीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शंभर सभा का घ्याव्या लागतात? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला. आज सर्वसामान्य माणूस पेटून उठला आहे. पण तरुणाईचा उत्साह अभूतपूर्व आहे, असंही अजित पवार म्हणाले.