राज्यपालांचं ‘ते’ पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल

| Updated on: Dec 12, 2022 | 1:06 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेलं पत्र आज उघड झालं.

राज्यपालांचं ते पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पाठवलेलं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख एवढी आधीची असताना आजच ते उघड कसं झालं? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय. छत्रपती शिवरायांबद्दल (Chatrapati Shivaji Maharaj) मी भाषणात जो उल्लेख केला, त्यातला अर्धवट वाक्य घेऊन गैरसमज पसरवण्यात आला. महापुरुषांचा अवमान करण्याची मी कल्पनाही करू शकत नाही, अशी कबूली भगतसिंह कोश्यारी यांनी या पत्रातून दिली आहे.
मात्र पत्रावरील तारीख पाहिली तर ते ६ डिसेंबर रोजीचं आहे. ते आज १२ डिसेंबर रोजी कसं बाहेर आलं? यामागे नेमकं काय राजकारण आहे? काय हेतू आहे, असा सवाल अमोल कोल्हे यांनी केलाय.

जर राज्यपाल यांनी पत्रात लिहिलंय की त्यांच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. असं असेल तर वारंवार तसी वक्तव्य का येतात? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. चंद्र-सूर्य आकाशात आहेत, तोपर्यंत त्यांचं तेच स्थान असेल. त्यामुळे शिवरायांविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्य का होतायत, याचंही उत्तर मिळणं अपेक्षित आहे, अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मी यासंदर्भात मागणी केली. महापुरुषांचा अवमान होऊ नये, यासाठी कायदा म्हणून मी संवैधानिक मागणी करत होतो. त्यावेळी माझा माईक बंद झाला. त्यामुळे नेमकं सरकारच्या मनात काय सुरु आहे, असा संशय निर्माण होतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.

राज्यपालांच्या पत्रात नेमकं काय?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेलं पत्र आज उघड झालं. त्यात ते म्हणालेत, माझ्या भाषणातला लहानसा अंश काढून काही लोकांनी त्याचं भांडवलं केलंय. मी म्हणालो होतो- मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आदींना आदर्श मानलं जात होतं. हे सगळे आदर्शच आहेत.

पण युवापिढी नवे आदर्श शोधत असते. म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी, शरद पवार हेही आदर्श असू शकतात.. असं माझं वक्तव्य होतं.

माझ्याकडून अनवधानाने चूक झाली तर तत्काळ पश्चाताप करण्यास मी संकोच करत नाही. मुगलकाळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंगजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांच्या अपमानाची कल्पना मी स्वप्नातही करू शकणार नाही, असा मजकूर त्यांनी पत्रात लिहिला आहे.