‘हर हर महादेव’च्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता?; आनंद दवे यांचा आव्हाड यांना सवाल

शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत अकारण गोंधळ निर्माण केल्याबद्दल ब. मो. पुरंदरे यांच्याकडून पंढरपूरमध्ये अक्षरशः माफीनामा लिहून घेतला गेला.

हर हर महादेवच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता?; आनंद दवे यांचा आव्हाड यांना सवाल
'हर हर महादेव'च्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता?; आनंद दवे यांचा आव्हाड यांना सवाल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 09, 2022 | 9:17 AM

पुणे: हर हर महादेव (har har mahadev) सिनेमाचा वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी भाष्य केल्यानंतर आता त्याला ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे (anand dave) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हर हर महादेव सिनेमाच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढत आहात? असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना दवे यांनी हा सवाल केला आहे.

हर हर महादेवच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात? बाबासाहेब पुरंदरे यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे का? बाबासाहेबांच्या कोणत्या लेखात असा उल्लेख आहे? चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण का करता आहात?, असा सवाल आनंद दवे यांनी केला.

या सिनेमाला सर्वात प्रथम विरोध आम्ही केला. तुम्हाला जागं व्हायला संभाजी राजे यांच वक्तव्य यावं लागल? चित्रपट चुकला आहे हे निश्चितच. पण त्या आडून घाणेरडे जातीय राजकारण करू नका. एव्हढी वर्ष सत्तेत आहात. का नाही एक समिती स्थापन केली खरा इतिहास शोधायला?, असा सवालही त्यांनी केला.

शरद पवार यांनी जाहीरपणे बाबासाहेबांचे कौतुक केलं होतं त्याबाबत काय बोलणार आहात? राजांना सेक्युलर ठरवण्याचं पाप तुम्ही आणि तुमचे सहकारी वारंवार करत आहात? द्याल का पुरावे? छत्रपतींची हत्या करायला आलेल्या अफझलच्या धर्मावर कधी बोलणार आहात? असा सवालही त्यांनी केला.

स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाच्या जातीवर कधी बोलणार आहात? का फक्त पुरंदरेच दिसतात तुम्हाला? द्या याची उत्तरे. आम्ही तयार आहोत तुमच्या बरोबर जाहीर चर्चा करायला. तुम्ही तयार आहात का चर्चेला? असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत अकारण गोंधळ निर्माण केल्याबद्दल ब. मो. पुरंदरे यांच्याकडून पंढरपूरमध्ये अक्षरशः माफीनामा लिहून घेतला गेला. जेम्स लेनला हाताशी धरून आई जिजाऊंची बदनामी करणाऱ्या संस्थांना योग्य धडा शिकवला गेला. आणि तिथे हे स्पष्ट झाले की इथून पुढे शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुणाला खोटा इतिहास लिहिता येणार नाही!, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

गेल्या 60-70 वर्षात मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचे असंख्य प्रयत्न ब. मो. पुरंदरे व त्यांच्या देशी-विदेशी शिष्यांनी हेतुपुरस्सर केले. ज्यात महाराजांचा जन्म, त्यांचे पिता, त्यांचे अध्यात्मिक व राजकीय गुरू, त्यांचे पुत्र संभाजीराजे यांचेबाबत जाणीवपूर्वक अफवा उडवून महाराजांना ब्राम्हणशाहीच्या अधीन असणारा एक मुस्लिमद्वेष्टा राजा अशा रुपात दाखवले गेले, असंही आव्हाड यांनी म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us