कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे का? : अनिल परब

| Updated on: Sep 11, 2020 | 3:29 PM

रामदास आठवले यांच्याकडे कुणी पाहत नाही, त्यामुळे प्रकाशझोतात येण्यासाठी ते करत आहेत, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे का? : अनिल परब
Follow us on

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर कारवाई झाली असेल, तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन आहे का? असा सवाल शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विचारला. (Anil Parab asks do BJP, RPI and Governor Bhagat Singh Koshyari support illegal construction of Kangana Ranaut)

“मुंबई महापालिकेचा कायदा काय आहे, ते बीएमसी कोर्टात सांगेल. नियम फॉलो केले नाहीत. नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे, ज्यांचे बांधकाम अनधिकृत असेल, त्यांच्यावर कारवाई होईल” असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

“सध्या रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे कुणी पाहत नाही, त्यामुळे प्रकाशझोतात येण्यासाठी ते करत आहेत. भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे. कंगनावर कारवाई झाली असेल तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर कामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे का? असा सवाल परब यांनी विचारला.

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयावर कारवाई करण्यात दाखवलेली घाई राज्यपालांना रुचली नाही. त्यामुळे अजॉय मेहता यांना राजभवनात बोलवून भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली नाराजी पोहोचवण्यास सांगितल्याचे वृत्त होते. तर कंगनाने भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी सरकारने तिच्या ऑफिसच्या पाडकामाबद्दल भरपाई देण्याची मागणी केली होती.

“कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला हात लावू नये, तिच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी होऊ नये, असं ज्यांना वाटते त्यांनी खुलेपणाने सांगावं” असं आव्हानही अनिल परब यांनी दिलं.

“म्हाडाची नोटीस चुकीची, पत्तेही चुकीचे”

“म्हाडाकडून आलेल्या नोटिशीबद्दल कालच समजलं. पण मी जागा मालक नाही, मी म्हाडाला विचारतोय की मला का नोटीस दिली. अनधिकृत असेल तर म्हाडाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. याचा अभ्यास करावा लागेल. चुकीची नोटीस दिली आहे. पत्तेही चुकीचे टाकले गेले आहेत. सुडाचं राजकारण सुरु झालं आहे. मंत्री म्हणून काम करतोय, म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे” असा दावाही परब यांनी केला. (Anil Parab asks do BJP, RPI and Governor Bhagat Singh Koshyari support illegal construction of Kangana Ranaut)

“अंगावर आलं त्याला शिंगावर घ्यायचं”

“कंगनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली हे बरं आहे. कंगनाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले, म्हणून वाद वाढला. शिवसेनेची खासियत आहे की, अंगावर आलं त्याला शिंगावर घ्यायचं” असेही यावेळी परब म्हणाले.

“मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. रेल्वे सुरु करणं धोक्याचं असेल, अन्यथा मेहनत वाया जाईल. यावर चर्चा सुरु आहे. राज्य सरकारकडे एसटी कर्मचा-ऱ्यांच्या पगारासाठी पैसे मागितले आहेत. लवकरच पगार होतील” अशी हमी अनिल परब यांनी दिली.

संबंधित बातम्या :

कंगना प्रकरणात राज्यपालांची उडी, अजॉय मेहतांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त

(Anil Parab asks do BJP, RPI and Governor Bhagat Singh Koshyari support illegal construction of Kangana Ranaut)