बाळासाहेब थोरात फक्त संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहेत का? आशिष देशमुखांचा सवाल

| Updated on: Sep 23, 2019 | 6:54 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली आहे, तरी काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत गोंधळ थांबण्याची चिन्ह दिसत नाही.

बाळासाहेब थोरात फक्त संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहेत का? आशिष देशमुखांचा सवाल
Follow us on

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली आहे, तरी काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत गोंधळ थांबण्याची चिन्ह दिसत नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बाळासाहेब थोरात फक्त संगमनेरचे (Sangamner) प्रदेशाध्यक्ष आहेत का? असा सवाल केला आहे. यामुळे काँग्रेसमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात फक्त संगमनेरचेच प्रदेशाध्यक्ष आहेत का? हा सवाल करत देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. आशिष देशमुख यांनी वर्षभरापूर्वीच आमदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते काँग्रेसचा सध्याचा प्रभावी युवा चेहरा मानले जातात. काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रासाठी 5 कार्याध्यक्ष नेमले आहेत. मात्र, ते आपल्या मतदारसंघाबाहेर पडतच नाही, असा थेट आरोप देशमुख यांनी केला आहे. हे मुद्दे काँग्रेस हायकमांडसमोरही मांडल्याचं आशिष देशमुखांनी सांगितलं.

देशमुख म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नेमके कुठे आहेत हा प्रश्न सर्वच काँग्रेसजणांमध्ये आहे. जर ते प्रदेशाध्यक्ष आहेत तर ते फक्त संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहेत का असाही प्रश्न आहे. केंद्रीय नेतृत्वाने राज्यात 5 कार्याध्यक्ष दिले आहेत. ते पाचही कार्याध्यक्ष फक्त आणि फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरतेच फिरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या संबंधात कुठेही प्रगती दिसत नाही. नेते जनतेपर्यंत पोहचत नाही.”

राज्यात काँग्रेसचे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष आहेत. यांनी जोमाने समोर येऊन भाजपच्या भूलथापांना जनतेसमोर उघडं पाडलं पाहिजे. एक काँग्रेसी म्हणून हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असंही आशिष देशमुख यांनी नमूद केलं.

‘शरद पवारांची हिंमत आणि कामाची शैली वाखाणण्याजोगी’

देशमुख म्हणाले, “शरद पवारांची हिंमत कामाची शैली वाखाणण्याजोगी आहे. या वयात तब्येत साथ देत नसताना, त्यांचे नेते त्यांना सोडून जात असताना ते खूप हिमतीने आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी काम करत आहेत. त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षही निवडणुकीत उतरला तर भाजप सरकारविषयीची जनतेच्या मनातील खदखद बाहेर येऊ शकते.”