शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करण्यास तयार : आशिष शेलार

| Updated on: Dec 14, 2019 | 12:28 PM

सरकार वाचवणं हाच जर शिवसेनेचा मुद्दा असेल, तर भाजप राजकीय तडजोड करेल, मग शिवसेनेला महाविकास आघाडीत राहून तो निर्णय घ्यायचा असू दे, किंवा बाहेर पडून, असं आशिष शेलार म्हणाले

शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करण्यास तयार : आशिष शेलार
Follow us on

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीवरुन केवळ सरकार वाचवण्यासाठी शिवसेना भूमिका बदलत असेल, तर भाजप शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करायला तयार आहे, असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ शेलारांनी (Ashish Shelar offers Shivsena) दुसरा प्रस्ताव ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा ही देशाची आवश्यकता आहे. लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. मग राज्यसभेतून पळ काढला. सरकार वाचवणं हाच जर शिवसेनेचा मुद्दा असेल, तर भाजप राजकीय तडजोड करेल, मग शिवसेनेला महाविकास आघाडीत राहून तो निर्णय घ्यायचा असू दे, किंवा बाहेर पडून, असं आशिष शेलार म्हणाले. ही माझी वैयक्तिक भूमिका असली तरी पक्षाची आणि माझी एकच भूमिका असल्याचं शेलार पुढे म्हणाले.

माझी सरकारला विनंती आहे, या कायद्याची अंमलबजावणी राज्य आणि देशहितासाठी राहील. केवळ सरकार वाचवणं या छोट्या भूमिकेतून त्याकडे बघू नका, त्यासाठी आपल्याला भूमिका बदलावी लागत असेल, तर भाजपचा नारा आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अखेर मी, त्यामुळे अशीच राजकीय तडजोडीची वेळ आली, तर भाजप नक्की सहकार्य करेल. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जरी अंमलबजावणीचा निर्णय केलात, तरी सहकार्य करु, सरकार सोडून जरी निर्णय घेतलात, तरी पाठिंबा राहील, असं आशिष शेलार ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

दरम्यान, आता पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं आहे. हे भाजपला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. सर्व काही सुरळीत सुरु असताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आम्ही याकडे लक्ष देणार नाही. त्यापेक्षा भाजपने पक्षांतर्गत जी धुसफूस सुरु आहे, त्याकडे लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली.

सेना-भाजपने एकत्र आवाज उठवलेला, आता बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून हाकला : सोमय्या

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजपने एकत्र यावं असं मत व्यक्त केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेना-भाजप युतीबाबत मोठं विधान केलं होतं. ‘आम्ही आशावादी आहोत. भाजप, शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. 30 वर्षांचे मित्र आहेत. आमच्या रक्तात हिंदुत्व समान आहे. पुन्हा एकत्र यावं, जनादेश दोघांना मिळाला होता. हा आशावाद आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

उत्तर महाराष्ट्रातील 12 पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी नाशिकमध्ये आयोजित बैठकीनंतर आशिष शेलार बोलत होते. काँग्रेसने भारत बचाव नाही तर पाकिस्तानी आणि बांगलादेशी बचाव सुरु केलं आहे. काँग्रेसच्या नौटंकीला देशातील नागरिक समर्थन देणार नाहीत. देशहिताचा हा कायदा असल्याने काँग्रेसचा उर्मटपणा बरा नव्हे. शिवसेनेने काँग्रेसला खतपाणी घालू नये हे स्थगिती सरकार आहे. स्थगिती दिली तर घुसखोरांना तुम्ही आश्रय देताय असं होईल. शिवसेनेने सरकारच्या भीतीपोटी निर्णय घेऊ नये. सेनेने सरकार वाचवण्याच्या नादात, घुसखोरांना वाचवण्याचं काम करु नये.
बाळासाहेबांच्या विचारसरणीला ते अनुसरुन नाही. सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेने सोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे, असं शेलार (Ashish Shelar offers Shivsena) म्हणाले.