मग घ्या ना धौती योग; आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक सल्ला कशासाठी?

| Updated on: Sep 29, 2022 | 10:33 AM

पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता "थापा" पण राहिला नाही आणि उत्सवही. यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले.

मग घ्या ना धौती योग; आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक सल्ला कशासाठी?
मग घ्या ना धौती योग; आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक सल्ला कशासाठी?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मयुरेश गणपत्येय, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भाजपने (bjp) आयोजित केलेल्या मराठी दांडियावर शिवसेनेच्या (shivsena) मुखपत्रातून जोरदार टीका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या टीकेचा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (ashish shelar) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मराठी दांडियावरील टीका म्हणजे केवळ राजकीय द्वेष आहे. यांच्या नजरेत भाजपची लोकप्रियता खूपत आहे. त्यामुळे भाजपची लोकप्रियता पचवण्यासाठी शिवसेनेने धौती योग चूर्ण खाल्ला पाहिजे, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून हा खोचक सल्ला दिला आहे. ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले, त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला ” मग घ्या ना धौती योग!, असं आशिष शेलार यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपा दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे “करुन दाखवले” असे होर्डिंग लावले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता “थापा” पण राहिला नाही आणि उत्सवही. यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच, असा हल्ला त्यांनी चढवला.

अहंकार, गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना…. प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनि सोडवी, तोडी भवपाशा ॥, अशी प्रार्थनाही शेलार यांनी केली आहे.