..तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, पंकजा मुंडेंचं आव्हान, टार्गेटवर ठाकरे सरकार

| Updated on: Oct 12, 2021 | 3:37 PM

औरंगाबादेत भाजपकडून आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.

..तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, पंकजा मुंडेंचं आव्हान, टार्गेटवर ठाकरे सरकार
औरंगाबाद ओबीसी मेळावा
Follow us on

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय. औरंगाबादेत भाजपकडून आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असं पकंजा मुंडे म्हणाल्या. (Pankaja Munde warns Mahavikas Aghadi government over OBC reservation )

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांच्या खालचं आरक्षणही संपुष्टात आलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आधीच अध्यादेश काढला असता तर या निवडणुकीत त्याचा फायदा झाला असता. जर ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. माझं सरकारला आवाहन आहे, अध्यादेश टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणूक घेऊन दाखवा. ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही रोज जात काढत होता त्याच मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण दिलं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का?’

मी आधीच उपाशी आणि त्यात उपवास, बहुजनांची अवस्थाही अशीच आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय.

पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार

येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने बीडच्या भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर पंकजा मुंडे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर कोण असणार? पंकजा मुंडे भगवान गडावरून काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.

इतर बातम्या :

पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्यावरुन पुन्हा संभ्रम; अजितदादांकडून आजची तारीख, तर सामंत म्हणतात, आताच नाही!

कोळसा तुडवड्याला मोदी सरकारचं चुकीचं धोरण जबाबदार, बावनकुळेंच्या आरोपांवरुन मलिकांचा पलटवार

Pankaja Munde warns Mahavikas Aghadi government over OBC reservation