MIM : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले; ‘एमआयएम’ गुगल मॅपविरोधात आक्रमक, तक्रार दाखल करणार

| Updated on: Jul 20, 2022 | 8:40 AM

गुगल मॅपवर (Google Maps) आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखवण्यात येत आहे. यामुळे एमआयएम आक्रमक झाले असून, पक्षाच्यावतीने गुगल मॅपविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

MIM : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले; एमआयएम गुगल मॅपविरोधात आक्रमक, तक्रार दाखल करणार
Follow us on

मुंबई : सध्या औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव बदलण्यास एमआयएमचा विरोध आहे. प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर गुगल मॅपवर (Google Maps) आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखवण्यात येत आहे. यामुळे एमआयएम आक्रमक झाले असून, पक्षाच्यावतीने गुगल मॅपविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. बेकायदेशीर कृत्य करणे, सामाजिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या कलमानुसार तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासोबतच न्यायालय आणि केंद्रीय यंत्रणांकडे देखील तक्रार नोंदवणार असल्याचे एमआयमएमने म्हटले आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, तेव्हा देखील एमआएमच्या वतीने विरोध करण्यात आला होता.

महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. मात्र नवे सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडीच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच पुन्हा औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पूर्वीचे सरकार अल्पमतात होते, त्यामुळे काही कायदेशीर पेच निर्माण होऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

एमआएमचा विरोध

औरंगाबादच्या नामंतरणाचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून रखडला होता. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नव्हता. या मुद्द्यावरून अनेकदा राजकारण तापल्याचे देखील पहायला मिळाले. अखेर उद्धव ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीमध्ये औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील या प्रस्ताव मंजुरीला विरोध केला नाही. मात्र एमआएमने या प्रस्तावाला विरोध करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता गुगल मॅपवर औरंगाबादऐवजी संभाजीनगर असे नाव दाखवण्यात येत असल्याने एमआएम आक्रमक झाली असून, गुगल मॅपविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.