परभणी : पंतप्रधान मोदी यांनी गेल्या सात वर्षांत ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेतुन विकास केला. त्याचबरोबर दहशतवाद्यांचा बीमोड करत देश सुरक्षितही ठेवला. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा दूत म्हणून आपण जनतेची सेवा करणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरूवारी परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी आ. मेघना बोर्डीकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, यात्रा संयोजक मनोज पांगारकर, सह-संयोजक प्रविण घुगे, माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम आदी उपस्थित होते. (Bhagwat Karad’s Jana Aashirwad Yatra in Parbhani)
डॉ.कराड म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी ग्रामीण भागामध्ये वीज, पाणी, रस्ते, पक्की घरे, स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस अशा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांमुळे हे शक्य झाले आहे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सामान्य माणसाला विकासाची फळे मिळू लागली आहेत. मराठवाड्याच्या विकासासाठी मोदी सरकारने व फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला. मात्र, महाविकास आघाडी सरकार सूडाने वागून मराठवाड्याच्या विकासात खीळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही कराड यांनी यावेळी केलाय.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवाद संपवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पत मोदींनी वाढवली. नरेंद्र मोदी यांनी देशात गोर-गरीब लोकांसाठी योजना काढल्या. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना काढली. महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना मोदींनी आणली. मोदी सरकारच्या काळात कलम 370 रद्द केलं. मोदींच्या काळात अयोध्येत राम मंदिराचं भूमिपुजन पार पडलं, अशी मोदींच्या कामांची यादीच भागवत कराड यांनी वाचून दाखवली. मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं मराठवाड्याचा विकास होईल, अशी ग्वाही यावेळी कराड यांनी जालन्यातील आपल्या भाषणात दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिक आणि महिलांसाठी विविध योजना आणल्या. 1980 ला मी 5 हजार रुपयात गॅस विकत घेतला होता. पण आज मोदींमुळे 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळत आहे. मोदींनी शेतकऱ्यांना युरियाच्या बॅगमागे 1 हजार 250 रुपये सबसिडी दिली. राज्यात मात्र अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे. आम्ही रस्त्यावर उतरुन कोरोना काळात काम केलं. पण मुख्यमंत्री घरात बसून म्हणतात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, असा जोरदार टोलाही दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
इतर बातम्या :
Bhagwat Karad’s Jana Aashirwad Yatra in Parbhani