दोन कोटी लोकांना रोजगार का मिळाला नाही? बिहार विधानसभेच्या मैदानात राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

| Updated on: Oct 23, 2020 | 3:53 PM

बिहारमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमने-सामने आले आहेत. निवडणूक प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. बेरोजगारी, नोटबंदी, लडाख सीमेवरील तणाव अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला.

दोन कोटी लोकांना रोजगार का मिळाला नाही? बिहार विधानसभेच्या मैदानात राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल
Follow us on

नवादा: बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमने-सामने आले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोट ठेवत २ कोटी लोकांना रोजगार का मिळाला नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे. लॉकडाऊनच्या काळात बिहारच्या मजुरांना विविध राज्यातून हाकलून देण्यात आलं. त्यावेळी मोदी सरकारनं त्यांची मदत केली का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवानांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केलाय. (Bihar election Rahul Gandhi on PM Narendra Modi )

“चीनच्या सैनिकांच्या हल्ल्यात आपले २० जवान शहीद झाले. आपली 1200 किलोमीटर जमीनही चीननं हडपली. चीननं आपल्या जमिनीवर प्रवेश केला असताना, पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवानांचा अपमान करताना, आपल्या जमिनीवर कुणीही पाऊल ठेवलं नाही, असं का म्हणाले? आणि आज त्याच शहीदांना नमन करत आहेत”. अशी टीकाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. तसंच पंतप्रधान मोदी जिथं जातात तिथं खोटं बोलतात अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

तेजस्वी यादव यांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

नितीश कुमार हे गेली १५ वर्षे झाली मंत्री आहेत. त्यांची डबल इंजिनाचं सरकार आहे. मात्र, ठाणे आणि ब्लॉकमध्ये भ्रष्टाचाराविना कुठलंही काम होत नाही. बिहारच्या लोकांकडे जो काही रोजगार होता, तो ही पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप, तेजस्वी यादव यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींचा RJD आणि काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील जनतेला संबोधित करताना RJD आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बिहारमधील लालटेनचा जमाना गेला. आज बिहारमध्ये रस्ते, वीज, सर्वकाही आहे. बिहारमधील लोक न घाबरता बिहारमध्ये राहात आहेत. ज्यांचा इतिहास बिहारला बिमारु बनवण्याचा आहे, त्यांना जवळपासही फिरु न देण्याचं आता बिहारच्या जनतेनं ठरवलं आहे’. अशा शब्दात मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या RJDवर शरसंधान साधलं.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, रॅली आणि सभांचा धडाका

Bihar election Rahul Gandhi on PM Narendra Modi